नवी दिल्ली – अजिंक्य रहाणेला सातत्याने येत असलेल्या अपयशावर माजी कसोटीपटू गौतम गंभीरने आपले मत व्यक्त केले आहे. रहाणेच्या फलंदाजीचे व त्याच्या सातत्याने बाद होण्याच्या पद्धतीकडे पाहिले तर असे लक्षात येते, की त्याचे फूटवर्कच अयोग्य होत आहे, असे गंभीर म्हणाला.
सातत्याने अपयशी ठरूनही रहाणेला वारंवार संधी मिळत आहे. मात्र, त्याला एकदाही जबाबदारीने मोठी खेळी करता आलेली नाही. रहाणेला एकेका धावेसाठीही झगडावे लागत आहे. अत्यंत खराब चेंडूवरही त्याचे तंत्र कुठेतरी चुकत आहे. त्याचा पाय चेंडूच्या टप्प्यापर्यंतही येत नसून त्याचे डोकेही स्थिर राहात नाही.
हे सर्व अयोग्य फूटवर्कमुळेच घडत आहे. त्याने आता नेटमध्ये सराव करताना मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मार्गदर्शन घेतलेच पाहिजे, अन्यथा त्याची कसोटी कारकीर्द संपुष्टात येईल, असेही गंभीरने सांगितले.
जोहान्सबर्गला झालेल्या कसोटीत दुसऱ्या डावात त्याने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटीत संधी मिळाली. अनुभवाला प्राधान्य देत द्रविडने रहाणेवर सातत्याने विश्वास दाखवला आहे, पण तरीही तो निराश करत आहे.
आता यानंतरही सातत्याने तो अपयशी ठरला तर त्याला वगळण्याव्यतरिक्त अन्य कोणताही पर्याय निवड समितीकडे राहणार नाही. हे त्याने ओळखून जबाबदारीने फलंदाजी केली पाहिजे, असेही गंभीर म्हणाला.