वर्धा, – महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाला वर्ध्या पोलिसांनी आज अटक केली. यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी 14 जानेवारी रोजी होणार आहे.
कालीचरण महाराजाला आज सकाळी वर्धा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी कालीचरण महाराजाला पोलीस कोठडी देण्यात यावी ही पोलिसांची मागणी फेटाळून लावत न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कालीचण याच्या वकिलांनी त्याला जामीन देण्यात यावा असा अर्ज न्यायालयात केला. त्यावर दुपारनंतर सुनावणी झाली. यावेळी पुढील सुनावणी 14 तारखेला होईल, असे न्यायालयाने सांगितले.
कालीचरण महाराजाला वर्धा पोलिसांनी आज ट्रान्झिट रिमांडवर छत्तीसगडमधून वर्ध्यात आणले होते.
रायपूरमधील कार्यक्रमात महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर कालीचरण महाराजाला मध्य प्रदेशातील खजुराहोमधून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर महाराष्ट्रातही गुन्हा दाखल असल्याने त्याचा ताबा आता महाराष्ट्र पोलिसांनी घेतला आहे.