नवी दिल्ली : ईशान्य भारतातील राज्य नागालँडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागालँडमधील मोन जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात 11 नागरीक ठार झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. ओटिंग भागात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्थानिकांना सुरक्षा दलाच्या वाहनांना आग लावली.
गोळीबारात ठार झालेले सामान्य मजूर होते. काम संपल्यानंतर एका पिकअपमध्ये बसून आपल्या घरी जात होते. मात्र, उशिरापर्यंत ते घरी न परतल्यामुळे गावातील लोकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी या घटनेचा उलगडा झाला.
या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत प्रशासनाकडून या घटनेला कोणताही दुजोरा देण्यात आला नव्हता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्वीटमुळे ही घटना समोर आली. मुख्यमंत्र्यांच्या ट्वीट आधी आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी ट्वीटरवर या घटनेबाबत एक व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, काही वेळेत हे ट्वीट डिलीट करण्यात आले.
NSCN (KYA) या फुटीरतावादी संघटनेशी संबंधित काही जण येणार असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या फुटीरतावाद्यांकडून दहशतवादी कृत्य केले जाऊ शकते ही शक्यता लक्षात घेऊन मोहीम आखण्यात आली. फुटीरतावादी कोणत्या रंगाच्या गाडीतून येणार त्याचीही माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्याच रंगाची गाडी आल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर ठार झालेल्या व्यक्ती सामान्य नागरीक असल्याचे जवानांना समजले.
The unfortunate incident leading to killing of civilians at Oting, Mon is highly condemnable.Condolences to the bereaved families & speedy recovery of those injured. High level SIT will investigate & justice delivered as per the law of the land.Appeal for peace from all sections
— Neiphiu Rio (@Neiphiu_Rio) December 5, 2021
दरम्यान, स्थानिकांमध्ये या घटनेमुळे रोष निर्माण झाला. मजूरांच्या गावातील ग्रामस्थ आणि स्थानिकांनी घटनास्थळी असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांच्या हातातून शस्त्रे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. काहींनी त्यांच्या वाहनांना आग लावली. त्यानंतर पुन्हा गोळीबार झाला. या घडामोडींमध्ये एका जवानाचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्री नेफियो रियो यांनी ट्वीट करून दु:ख व्यक्त केले. या घटनेची एसआयटीकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. या घटनेतील पीडितांना न्याय देण्यात असल्याचेही त्यांनी सांगितले. गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले. या घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय एसआयटी नेमण्याची घोषणा त्यांनी केली.