जालना – देशात करोना विषाणूचा नवा व्हॅरियंट असलेल्या ओमायक्रॉनने प्रवेश केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ‘चिंता’ व्यक्त केलेल्या या नव्या व्हॅरियंटचे भारतात आतापर्यंत तीन रुग्ण आढळून आले आहेत. ओमायक्रॉनची चिंता असतानाच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेंसंदर्भात सूचक इशारा दिला आहे.
राजेश टोपे यांनी म्हटलं की, कदाचित पुढच्या महिन्यात करोना संसर्गाची तिसरी लाट येऊ शकते. मात्र घाबरण्याचं कारण नाही. तसेच ओमायक्रॉन धोकादायक नसल्याचं टोपे यांनी म्हटलं. ते माध्यमांशी बोलत होते.
मंत्री टोपे पुढे म्हणाले की, ओमायक्रॉनला लगेच घाबरण्याचं कारण नाही. ओमायक्रॉनमुळे लगेच निर्बंध लावणे नागरिकांसाठी त्रासदायक ठरेल. मात्र सर्वांनी आपल्या पातळीवर काळजी घेणं गरजेचं असल्याचे टोपे यांनी नमूद केलं.