यवतमाळ – रस्त्याने जाताना दुचाकीचा धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून दुचाकीस्वार तरूणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या काळी दौलत भागात घडली आहे. शाम राठोड (वय 25, रा. काळी दौलत, यवतमाळ) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी काळी दौलत खान परिसरात वर्दळीच्या ठिकाणी घडली. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पुसद ग्रामीण पोलिसांनी परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, महागाव तालुक्यातील काळी दौलत खान परिसरात राहणारा शाम राठोड हा युवक दुचाकीने दुपारच्या सुमारास जात होता. यावेळी दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून गावातील चौकात वाद निर्माण झाला. त्यानंतर रागाच्या भरात शाम याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाण करताना एकाने तलवार काढून त्याच्या शरीरावर वार करून गंभीर जखमी केले. जखमी झालेला शाम रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
खून करून अज्ञात आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर बस स्थानक चौकात सायंकाळी जाळपोळ करण्यात आली. घटनेला जातीय रंग आल्याने काही काळ गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. खूनाची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. हत्या करून पसार झालेल्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.