नीरामध्ये महावितरणविरोधात शेतकऱ्यांचा संताप
नीरा – नीरा (ता. पुरंदर) येथील परिसरातील शेतकऱ्यांनी वीज बिल न भरल्याने महावितरणने ट्रान्सफॉर्मरच बंद केले आहेत. त्यामुळे वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्याचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी (दि.22) महावितरणचे नीरा विभागाचे उपकार्यकारी अभियंता पवनकुमार पवार यांच्याकडे निवेदन दिले आहे.
प्रामाणिक शेतकऱ्यांवर अन्याय करू नका, असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी यावेळी दिला.
महावितरणाने थकीत वीज बिल वसुलीची मोहीम सुरू आहे. महावितरणाने गुळूंचे, कर्नलवाडी, राख, जेऊर आदी गावांतील ट्रान्सफॉर्मरच बंद केले आहेत. त्यामुळे वेळेवर वीज बिल भरणाऱ्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
यासंदर्भात निवेदन देऊन लोकांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. यावेळी कर्नलवाडीचे सरपंच सुधीर निगडे, भाजपचे संजय निगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य कांचन निगडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष पृथ्वीराज निगडे, राखचे माजी उपसरपंच गोरख पवार, प्रशांत रणवरे, जेऊरचे दादासाहेब शिंदे, दत्तात्रय शिंदे, तुकाराम कुंभार, ज्ञानदेव निगडे, बाळासाहेब शिंदे, नरेंद्र रासकर आदी ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.
महावितरणचे अधिकारी पवनकुमार पवार यांनी मात्र, लोकांना वीज बिल भरा, मग लगेच वीज पुरवठा सुरू करतो, असे सांगून शेतकऱ्यांची बोळवण केली आहे.
प्रामाणिकपणाला न्याय नाही
पुरंदर तालुक्यासह जिल्ह्यात महावितरणकडून वीजतोडणी मोहीम जोरदार राबविली आहे. यात जिल्ह्यातील सोळाशे प्राथमिक शाळांचा वीजपुरवठाही सुटला नाही. एकीकडे शिक्षण क्षेत्रात वीज तोडणीमुळे अंधार पसरला असतानाही पुरंदर तालुक्यातील प्रामाणिक बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांवर तोडणीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे महावितरणने ग्राहकांना चांगलाच झटका दिला आहे.