जिल्हा अधीक्षक देशमुख यांच्या सूचना : अपवादात्मक परिस्थितीतच जावे लागणार
बारामती – पासपोर्टसाठी पोलीस पडताळणी करताना स्थानिक पोलिसांनी संबंधित व्यक्ती भारतीय नागरिक आहे का आणि त्या व्यक्तीविरुध्द कोणते गुन्हे प्रलंबित आहे किंवा न्यायालयाचे वॉरंट प्रलंबित आहे काय या दोनच बाबी तपासाव्यात, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्या आहेत.
अपवादात्मक परिस्थिती वगळता पासपोर्टच्या पोलीस पडताळणीसाठी पोलीस ठाण्यात जावे लागणार नाही.पासपोर्ट पडताळणीसाठी संबंधित व्यक्तीच्या घरी जाण्याची अथवा त्याला पोलीस ठाण्यात बोलण्याचीही आवश्यकता नाही. त्या व्यक्तीबाबत एखादी गोष्ट संशयास्पद वाटत असेल तरच पोलिसांनी त्याची प्रत्यक्ष भेट घेणे गरजेचे आहे. या पुढील काळात अपवादात्मक परिस्थिती वगळता पोलीस पडताळणीसाठी कोणालाही पोलीस ठाण्यात बोलावायचे नाही, असे त्यांनी नमूद केले आहे.
डॉ. देशमुख यांनी दिलेल्या सूचनेमध्ये नमूद केले आहे की, 2018 मधील नवीन प्रक्रियेनुसार पासपोर्ट पडताळणीमध्ये पोलिसांनी फक्त नागरिकत्व व गुन्ह्यांबाबतचीच पडताळणी करायची आहे. संबंधित व्यक्तीने पासपोर्ट काढण्यासाठी जी कागदपत्रे पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये दाखल केलेली आहेत, ती कागदपत्रे खरी आहे अथवा खोटी आहेत याची तपासणी करण्याची पोलिसांना आवश्यकता नाही.
ते काम पासपोर्ट सेवा केंद्राचे आहे. त्या व्यक्तीचा पत्ता पडताळण्याची गरजही पोलिसांना यामध्ये नाही. ज्यांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावायचे आहे. त्याबाबतचे लेखी आदेश उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने काढूनच त्यांना चौकशीला बोलवावे.
गोपनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून पासपोर्ट पडताळणीचे काम काढून ते महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे सोपवावे. भारताचे नागरिकत्व व प्रलंबित गुन्हेगारी न्याय प्रक्रिया वगळता इतर कुठल्याही कारणासाठी पोलिसांनी पाठविलेला प्रतिकूल रिपोर्ट पासपोर्ट विभागातर्फे ग्राह्य मानला जात नाही. असे असतानाही पोलीस पडताळणीसाठी अनावश्यक वेळ वाया घालवला जातो, लोकांना पोलीस ठाण्यात बोलावले जाते त्यांच्याकडून अनेक कागदपत्रे मागितली जातात.
ही प्रक्रिया राबवली जाणार
व्यक्तीच्या नागरिकत्वाची खात्री त्याचे नागरिकत्व डोमिसाईल प्रमाणपत्र पाहून व गावातील पोलीस पाटील यांना फोन करून तात्काळ करून घ्यावी. संबंधित व्यक्तीवर दाखल असणाऱ्या गुन्ह्यांची माहिती घेण्यासाठी सीसीटीएनएस, कोर्ट चेकर व ई कोर्ट यावर ऑनलाइन तपासणी करून दोन दिवसांच्या आत पोलीस पडताळणीचा रिपोर्ट पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाठवण्यात यावा. जिल्हा विशेष शाखेने दोन दिवसांत रिपोर्ट पासपोर्ट केंद्राला पाठवावा, असे निर्देश डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले आहेत.