लखनौ – तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याखेरीज आमचे अन्यही काही महत्वाचे विषय आहेत ज्यावर केंद्र सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांनी उद्या लखनौ मध्ये महापंचायत आयोजित केली असून त्यासाठी टिकेैत येथे आले आहेत. त्यावेळी ते पीटीआयशी बोलत होते.
ते म्हणाले की तीन कायदे रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास अजूनही सरकार तयार नाही. त्यामुळे सरकारने नाईलाजाने हे कायदे रद्द केले आहेत की त्यांनी मनापासून ही कृती केली आहे हे कळण्यास मार्ग नाही.
सरकारने शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. मोदींनी कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घोषित करण्याच्याही आधी आम्ही लखनौची किसान महापंचायत आयोजित केली होती. त्यामुळे उद्या ठरल्याप्रमाणेच येथे महाकिसान पंचायत होईल असेही टिकैत यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी केंद्र सरकारपुढे एकूण सहा महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. पंतप्रधानांना पाठवलेल्या खुल्या पत्रात त्यांनी या मागण्या मांडल्या आहेत. त्यात किमान हमी भावाची कायदेशीर तरतूद करावी, अजय मिश्रा यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावे, शेतकऱ्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले खटले मागे घ्यावेत, आंदोलन काळात जे शेतकरी ठार झाले त्यांचे आंदोलन स्थळी स्मारक उभारावे, आणि वीज कायद्यात सुधारणा करावी या त्यांच्या मागण्या आहेत.