मुंबई – पंतप्रधान नरेंद मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारला चिमटे काढले आहेत. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये किमत चुकवावी लागणार असल्याचे लक्षात आल्याने हे कायदे मागे घेण्यात आले, उशीरा का होईना मोदी सरकारला शहाणपण आलं आहे, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
शरद पवार म्हणाले, मोदी सरकारने कायदे मागे घेतले हे योग्यच झालं आहे. कोणतीही चर्चा न करता केंद्र सरकारने हे कायदे आणल्याने जनतेकडून या कायद्यांला मोठा विरोध झाला. इतिहासात पहिल्यांदा एक वर्षाहून अधिक काळ शेतकरी सीमेवर बसले. थंडी, ऊन, वारा, पावसाचा विचार न करता शेतकरी संघर्ष करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढायला हवा होता. पण त्यांनी हे केलं नाही. तिन्ही कायदे मागे घ्या असे शेतकरी संघटनेने सांगितले होते पण त्याची दखल घेतली गेली नसल्याने संघर्ष झाला. काही दिवसांत पंजाब, उत्तर प्रदेशातील निवडणुका आहेत. प्रचारासाठी गावात गेल्यावर शेतकरी जाब विचारतील हे लक्षात आल्यावर केंद्र सरकारने कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. उशीरा का होईना शहाणपण आले. संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो, असे पवार म्हणाले.