मुंबई – आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कंगनाने भारतीय स्वातंत्र्याला भीक संबोधून अकलेचे तारे तोडले आहेत. कंगनाची या वक्तव्याचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येत असला तरी काहींनी तिच्या या वक्तव्याचे समर्थन देखील केले आहे. कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन करणाऱ्यांमध्ये अभिनेते विक्रम गोखले यांचा देखील समावेश आहे. गोखलेंच्या कंगना समर्थनामुळे समाज माध्यमांवर त्यांच्याविरोधात जोरदार आगपाखड सुरु आहे. असं असतानाच गोखलेंच्या वक्तव्याचे गायक अवधूत गुप्तेंनी समर्थन केल्याने ते देखील टीकेचे धनी ठरले आहेत.
या प्रकरणात आता उपराकार लक्ष्मण माने यांनी उडी घेत कंगना, गोखले व गुप्तेंना अल्टिमेटम बजावले आहे. याबाबत बोलताना माने म्हणाले, “सिनेअभिनेत्री कंगना रनौत हिने पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर एका कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त विधान केले. त्यानंतर विक्रम गोखले आणि गायक अवधूत गुप्ते यांनी देखील समर्थन केले. त्यामुळे मी तिघांचा निषेध व्यक्त करतो. देशाच्या स्वातंत्र्या लढ्यात जे शहीद झाले त्या सर्वांचा तिघांनी अपमान केला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तातडीने कारवाई झाली पाहिजे. याविरोधात आज मी पोलिसांकडे तक्रार करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.”
मी आंबेडकरवादी मला महात्मा गांधी, सावरकर आणि लोकमान्य टिळक यांचे विचार पटत नाही. पण….
“मी आंबेडकरवादी असून मला महात्मा गांधी, सावरकर आणि लोकमान्य टिळक यांचे विचार पटत नाही. पण त्यांचे देशाच्या जडणघडणीत आणि स्वातंत्र्यामध्ये योगदान मोठे आहे. त्यांच्या कार्यावर कोणीही बोलणार असेल तर मी सहन करणार नाही. जे लोक आज स्वातंत्र्याबद्दल बोलत आहे त्या लोकांचे देशासाठी काय योगदान आहे? या तिघांपैकी एकाने पुढे येऊन या प्रश्नाचं उत्तर द्यावं,” असं आव्हान लक्ष्मण माने यांनी तिघांना दिलं.
तर केव्हाच देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असता
“जर मी किंवा इतर कोणी असं बोललो असतो, तर केव्हाच देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असता आणि जेलमध्ये टाकलं असतं. मात्र यामागे आरएसएस असून त्यानुसार ती अभिनेत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. त्या पार्श्वभूमीवर येत्या ८ दिवसात कंगना रनौत, विक्रम गोखले आणि अवधूत गुप्ते यांनी देशातील जनतेची जाहीर माफी मागावी. अन्यथा विक्रम गोखले यांच्या पुण्यातील घराबाहेर सत्याग्रह करणार आहे,” असा इशाराही माने यांनी दिला.