पुणे – मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला विभागात खरेदीसाठी येणाऱ्या टेम्पोसाठी पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. मात्र, या निर्णयाला टेम्पो संघटना, कामगार संघटना आणि आडते आणि खरेदीदारांनी विरोध केला आहे. प्रशासनाने हा निर्णय शुक्रवारपर्यंत रद्द न केल्यास येत्या रविवारपासून (दि.21) मार्केट यार्डातील बाजार बंद ठेवण्याचा निर्णय बाजार घटकांनी घेतला आहे.
टेम्पो संघटना, कामगार संघटना, आडते संघटनांचे प्रतिनिधी तसेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील किरकोळ खरेदीदारांची संयुक्त बैठक मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांच्यासमवेत झाली. यात पार्किंग शुल्क आकारणीबाबत चर्चा झाली. मात्र, त्यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे पुन्हा बुधवारी (दि.17) संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्याचा निर्णय झाला. मात्र, टेम्पो पार्किंग शुल्काबाबत निर्णय न झाल्यास सर्व घटक बाजार बंदच्या भूमिकेवर ठाम असणार आहेत.
प्रशासक मधुकांत गरड यांच्या समवेत झालेल्या बैठकीला फळविभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे, भाजीपाला विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर, आडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष अमोल घुले, सचिन पायगुडे, राजेंद्र कोरपे, टेम्पो संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे, राजू रेणूसे, कामगार संघटनेचे विजय चोरगे शशिकांत नागरे, नितीन जामगे, विलास थोपटे, संजय साष्टे, विशाल केकाने, तोलणार संघटनेचे राजेंद्र चोरगे आदी उपस्थित होते.
बाजारात खरेदीसाठी येणारा टेम्पोचालक सेस, लेव्ही आणि आडत भरत असतो. असे असतानाही पुन्हा त्यासाठी अतिरिक्त पार्किंग शुल्क आकारणे चुकीचे ठरेल. त्यामुळे पार्किंग शुल्काचा निर्णय रद्द करण्याची विनंती आम्ही बाजार समिती प्रशासनाला केली आहे. प्रशासनाने निर्णय रद्द न केल्यास आमचा बंद कायम असणार आहे.
– विलास भुजबळ, अध्यक्ष, आडते संघटना.
टेम्पोच्या पार्किंग शुल्काबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी (दि. 17) प्रशासक मधुकांत गरड यांनी आडते, कामगार, व्यापारी प्रतिनिधींची बैठक बोलाविली आहे. यात शुल्क आकारणीबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास पुकारण्यात आलेला बंद मागे घेण्यात येईल, अन्यथा बंद कायम असणार आहे.
– संतोष नांगरे, अध्यक्ष, टेम्पो संघटना
टेम्पो चालकांकडून पार्किंग शुल्क घेणार
फळे, भाजीपाला विभागातून दररोज एक हजार ते पंधराशे टेम्पोमधून शेतमालाची आवक होते. तो खरेदीसाठी शहर, उपनगर, ग्रामीण आणि शेजारच्या जिल्ह्यांतून तब्बल तीन ते चार हजार वाहने दररोज मार्केट यार्डात येतात. तीनचाकी आणि चारचाकी टेम्पोकडून अनुक्रमे 100 ते अडीचशे रुपये कसलीही पावती न देता पार्किंग आणि वाराईच्या नावावर वसुल करत असल्याचे बाजार समितीच्या प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही प्रथा मोडीस काढण्यासाठी वाहतुकीसाठी आडथळा निर्माण न होता पार्किंगला जागा उपलब्ध करून देऊन तीनचाकीसाठी 50 आणि चारचाकीसाठी शंभर रुपये (प्रती दोन तास) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करून पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीचे परवानाधारक हमाल पावती देऊन ही रक्कम स्वीकारणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.