मुंबई – गेल्या तीन-चार दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. हा संप मागे घेण्यासाठी सरकारही दबावतंत्राचा वापर करत आहे.
राज्य सरकारने आतापर्यंत ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तरीही एसटी कर्मचारी आपला संप मागे घेण्यासाठी तयार नसल्याचे दिसून येत आहे.
कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळू नये म्हणून सर्वच स्तरांवरुन प्रयत्न सुरु आहे. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज (दि. ११) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांची भेट घेतली आहे.
मुंबईतील कृष्णकुंज या राज यांच्या निवसास्थानी ही बैठक पार पडली. बैठकी दरम्यान अनेक महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“एसटी कर्मचारी संघटनेची लोक राज ठाकरेंना भेटली. २८ संघटनांना बाजूला ठेवून एसटी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत असं त्यांनी राज यांना चर्चेदरम्यान सांगितलं. त्या सर्व कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी एसटी महामंडळचे विलीनीकरण करावे अशी आहे.
तसेच, या भेटीत राज ठाकरेंनी सुरुवातीला शिष्टमंडळाला “मी आत्महत्या करणाऱ्यांचं नेतृत्व करत नाही. आधी आत्महत्या थांबवा ही माझी अट आहे असं आवाहन सुद्धा केले’.