नवी दिल्ली – कोणते उत्पादन कोणत्या देशातून आले आहे, याची नियमाप्रमाणे नोंदणी न केल्याप्रकरणी सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना 202 नोटिसा पाठविल्या आहेत.
इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे आणि घरगुती वापराच्या वस्तू संदर्भात या कंपन्यांनी नियमाचा भंग जास्त प्रमाणात केला असल्याचे दिसून आले. 202 नोटिसा व्यतिरिक्त आणखी 15 नोटिसा या कंपन्यांना बजावल्या आहेत. उत्पादनाचा बाद कालावधी, उत्पादकाचा पत्ता या संदर्भात नियमाचा भंग केला असल्यामुळे या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
मात्र कोणत्या कंपन्यांना या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत याची माहिती ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केली नाही. नियमभंग करणाऱ्या कंपन्यांचे नाव का जाहीर करण्यात आले नाही असे विचारले असता ग्राहक व्यवहार विभागाच्या सचिव लीना नंदन यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत आम्ही कंपन्या आणि ग्राहकांना सावध करण्याच्या दृष्टिकोनातून या नोटिसा जारी केल्या आहेत.
ग्राहकांना या संदर्भात तक्रारी करण्याची यंत्रणा आणखी मजबूत करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात ग्राहकांनी तक्रार दाखल केल्यास चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विमान उड्डाण रद्द होऊनही ग्राहकांना पैसे परत न देणे, चुकीची वस्तू ग्राहकांना देणे या संदर्भातही ग्राहकांच्या तक्रारी येत असून त्या सोडविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.