पुणे – कालवा समितीच्या बैठकीत पाणी वापर कमी करण्याचे निर्देश महापालिकेस देण्यात आले आहेत. त्यानंतरही महापालिका खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी उचलत आहे. त्याचा उन्हाळ्यातील पाणी नियोजनावर परिणाम होणार आहे.
त्यामुळे महापालिकेने आता पासूनच पाणी वापर कमी करावा, अन्यथा उन्हाळ्यात पाणी कमी पडल्यास त्यास महापालिका जबाबदार असेल, असा सज्जड दम पाटबंधारे विभागाने महापालिकेस भरला आहे. दरम्यान, महापालिका प्रशासन दिवाळीनंतर खडकवासला धरणातील पाणी कमी उचलणार आहे. त्यामुळे शहराच्या काही भागात पाणी कपातीचे नियोजन प्रशासनाकडून सुरू करण्यात आले आहे.
कालवा समितीच्या जानेवारी आणि मार्चमध्ये झालेल्या बैठकीत धरणातील पाणी सिंचन तसेच पाणी पुरवठा योजनांसाठी पाणी नियोजन असल्याने महापालिकेने खडकवासला धरणातील दैनंदिन पाणी वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र, त्यानंतरही अद्याप पालिकेने पाणी वापर कमी केलेला नाही. तर 21-22 या वर्षासाठी भामा आसखेड धरणातून दैनंदिन 200 एमएलडी पाणीवापर गृहीत धरून महापालिकेस 10.99 टीएमसी पाणी निर्धारित केले जाणार आहे. त्यामुळे उर्वरित पाणी सिंचनासाठी असणार आहे.
मात्र, प्रत्यक्षात महापालिका दोन्ही धरणांतून दैनंदिन स्वरूपात घेत असलेले पाणी पाहता हा पाणी वापर सुमारे 15 ते 17 टीएमसीपर्यंत जात आहे. परिणामी, पुढील वर्षी उन्हाळ्यात सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने तत्काळ पाणी वापर करावा, असे पत्र पाटबंधारे विभागाने दिले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडूनही सध्याचा दिवाळीचा काळ लक्षात घेऊन पाणीवापर तूर्तास कमी न करण्याची भूमिका घेतली असून दिवाळीनंतर काही प्रमाणात पाणी घेणे कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.