नगर – करोना नियमांना शिथिलता दिल्यानंतर नगर शहरात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र आहे. दररोज खून, दरोड्या, घरफोडी, रस्तालूट अशा घटनांमध्ये वाढ झाली असून, सामान्य माणसाठी सुरक्षितता धोक्यात आली आहे.
जिल्ह्यातील करोना कमी झाला आणि शासनाच्या आदेशानुसार सर्व जनजीवन सुरळीत झाले. परंतु, करोना काळात लोकांची सेवा करणाऱ्या पोलीस यंत्रणेची चिंता वाढली. गेल्या दोन महिन्यांपासून नगर चोऱ्या, घरफोड्या, रस्ता लूट, दरोडा आदी प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी त्यातील अनेक टोळ्या जेरबंद केल्या. मात्र तरीही राहुरी, श्रीरामपूर, कोपरगाव, नगर शहर परिसरात चोऱ्या, घरफोड्या सुरू आहेत. तर, दुसरीकडे दिवस लुटीच्या घटना वाढल्या आहेत. नगर शहरात गेल्या काही दिवसांमध्ये दिवस रोकड लांबविल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावने नित्यातेच बनले आहेत.
तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नवीन वसाहती होत आहेत. त्यात अनेक ठिकाणी रात्री पथदिव्यांची व्यवस्था नाही. त्यामुळे चोर अंधाराचा फादा घेऊन घरफोड्या करून रोकड व सोन्या चांदीचे दागिने चोरून नेत आहेत. दोन दिवसांपूर्वी बालिकाश्रम रस्त्यावरील बिअर शॉपी फोडून चोरांनी हजारोंचा मुद्देमाल चोरून नेला. तर तपोवन रस्त्यावरील एक बंगला फोडून अमेरिकन डॉलरसह सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
दरम्यान, चोरांनी काल सावेडी भागातील एक वसतिगृह फोडून 13 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. कोतवाली, तोफखाना पोलिसांनी गेल्या काही दिवसांपूर्वी रस्ता लूट व दरोड्याच्या तयारीतील टोळ्या जेरबंद केल्या. मात्र, तरी शहरातील चोऱ्या, घरफोड्या, धूमस्टाई चोरी, रस्ता लूट थांबण्यास तयार नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांची सुरक्षितात धोक्यात आल्याचे नागरिकांमधून बोलले जाते.
नागरिकांनी घराबाहेर पडताना मौल्यवान वस्तू घरात ठेवू नये. कॉलनीमध्ये शक्यतो सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. रात्रीच्यावेळी घरा बाहेरील दिवे सुरू ठेवावेत. गुन्हेगारांच्या शोधासाठी शहरात बिगर नंबर प्लेट वाहनांची तपासणी सुरू आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढून रेकॉडवरील गुन्हेगारांचाही शोध सुरू आहे.
– ज्योती गडकरी, पोलीस निरीक्षक
पोलीस गस्त वाढविण्याची मागणी
सावेडी उपनगरात तपोवन रोड, बोल्हेगाव, कॉटेज कॉर्नर, निर्मलनगर, केडगाव, कल्याण रोड आदी भागात घरफोड्या झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे या भागात रात्रीची पोलीस गस्त वाढविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.