नवी दिल्ली : सलग तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उत्तराखंडमध्ये धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे उत्तराखंडचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. पावसामुळे राज्यात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या मुसळधार पावसामुळे राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरु केल्या आहेत.
सोमवारी पावसामुळे पाच लोकांचा मृत्यू झाला. आज 11 जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे राज्यातील संकटावर लक्ष ठेऊन आहेत. उत्तराखंडमध्ये लष्कराची मदत घेण्यात येणार असल्याचं त्यांनी या आधीच स्पष्ट केले होते. त्यानुसार अनेक ठिकाणी आता लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.
तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक प्रदेशांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक ठिकाणी लोक फसले आहेत. प्रशासनाच्या वतीने बचाव कार्य हाती घेण्यात आले असून या लोकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचे कार्य सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याशी चर्चा करुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच राज्याला आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
तर दुसरीकडे केरळमध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. केरळमध्ये सध्या जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेक पूरग्रस्त भागांत लष्कर आणि एनडीआरएफच्या पथकांकडून बचाव कार्य सुरु आहे.