नवी दिल्ली – दुसऱ्या तिमाहीत म्हणजे जूलै ते सप्टेबर दरम्यान पुण्यातील घर विक्रीत 43 टक्क्यांची वाढ झाली. या तिमाहीत पुणे शहरात 10,128 इतकी घरे विकली गेली असल्याची माहीती एका अहवालात देण्यात आली आहे. या काळात देशातील 8 मोठया शहरात घर विक्री 59 टक्क्यांनी वाढून ती 55,907 इतकी झाली आहे. या काळात घरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे हे क्षेत्र खात्रीने पुर्वपदावर येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
करोनाच्या पहिल्या लाटेमुळे गल्या वर्षी जूलै- सप्टेबरदरम्यान तिमाहीत केवळ 35,132 इतक्या घराची विक्री झाली होती. तर दुसऱ्या लाटेमुळे या वर्षी एप्रील- मे दरम्यान 15,968 इतक्या घराची विक्री झाली होती. आता परिस्थिती बरीच सुधारली आहे. त्याचबरोबर ग्राहकांकडून घरांची मागणी वाढू लागली असल्याचे प्रॉप टायगर या संस्थेने म्हटले आहे.
या अहवालात म्हटले आहे की, एक तर सध्या घरासाठीच्या कर्जावरील व्याजदर फारच कमी आहेत. त्याचबरोबर इन्व्हेंटरी कमी करण्यासाठी विकसकांनी घरांचे दर फारसे वाढविले नाहीत. शिवाय करोनामुळे स्वतःचे घर असावे अशी इच्छा नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. यामुळे सध्या घरांची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
जर आगामी तिमाहीत ही आकडेवारी अशीच सकारात्मक राहिली तर घरबांधणी क्षेत्र आगामी काळात वेगाने आगेकूच करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या संस्थेबरोबर इतर तीन संस्थांनी गेल्या पंधरवड्यात घरांची विक्री वाढली असल्याचे आकडेवारी जाहीर केली आहे. सर्वसाधारणपणे विक्री वाढली असल्याचे मत यात सर्व अहवालात व्यक्त करण्यात आले असले तरी आकडेवारीत मात्र बरीच तफावत दिसून येते.
आता उत्सवाच्या काळात घर विक्री वाढेल याबाबत विकसक आशावादी झाले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारही या क्षेत्राला चालना देत असल्याचे वातावरण आहे. या अहवालातील माहितीनुसार अहमदाबाद, शहरातील घर विक्री 64 टक्क्यांनी, बंगळूरू शहरातील घर विक्री 36 टक्क्यांनी, चेन्नई शहरातील घर विक्री 100 टक्क्यांनी वाढली. मात्र दिल्ली आणि लगतच्या भागातील घर विक्रीत फारसा फरक पडला नाही.
हैदराबाद शहरातील घर विक्री 100 टक्क्यापेक्षा जास्त वाढली आहे. कोलकत्ता शहरातील घर विक्री मात्र केवळ सहा टक्क्यांनी वाढली आहे. मुंबई शहरातील घर विक्री 92 टक्क्यांनी वाढवून 14,163 इतकी झाली आहे. या आकडेवारीनुसार 45 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घराला प्राधान्य मिळत आहे. एकूण विक्रीत या घरांचा वाटा 40 टक्के इतका आहे. तर 45 लाख ते 75 लाख किमती दरम्यानच्या घरांचा वाटा 28 टक्के आहे. या कालावधीत घरांचा पुरवठा वाढला असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान देशातील घरांचा पुरवठा तीन पटीने वाढून 65,211 इतका झाला आहे. गेल्या वर्षी या काळात फक्त 19,865 एवढा नव्या घरांचा पुरवठा झाला होता.