सतीश जाधव
आपण सोशल मीडियाच्या पूर्णपणे आहारी गेलो आहोत, हे आता स्पष्ट झाले आहे. कारण काही तास सोशल मीडिया बंद पडल्यामुळे अनेकांचे व्यवहार बंद पडल्याचे चित्र होते. वैयक्तिच नव्हे तर सांघिकरूपाने सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेलो आहोत. या जाळ्यातून आपण मुक्त व्हायला पाहिजे. किमान यावरील अवलंबित्व तरी कमी व्हायला हवे.
काही दिवसांपूर्वी फेसबुक, व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अचानक बंद पडले. सुमारे सहा तासांपर्यंत हे तिन्ही प्लॅटफॉर्म काम करत नव्हते. अर्थात ही घटना सामान्य नाही. यातून सायबर हल्ल्याचे संकेत मिळत आहेत. ज्या कंपनीची सेवा विस्कळीत झाली आहे, त्या मोठ्या कंपन्या आहेत. त्यांच्या सेवेची व्याप्ती मोठी आहे.
परिणामी या घटनेचा जगभरातील यूजर्सना फटका बसला. या कंपन्या आपला प्लॅटफॉर्म सुरक्षित राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करतात; परंतु जेव्हा एवढ्या सक्षम कंपन्यांनाच सुरुंग लावला जातो, तेव्हा अब्जावधी यूजर्स चिंतेत पडणे साहजिकच आहे.
गेल्या काही वर्षांत अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नव्हती; परंतु यंदाची घटना पाहता आगामी काळात अशा प्रकारचा सोशल मीडियाचा अचानक “लॉकडाऊन’ केला जाऊ शकतो. कारण सायबर गुन्हेगारीचा आता सुवर्णकाळ सुरू आहे.
आताच्या घटनेतून आपण काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. आतापर्यंत तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म का बंद पडले, याचे संयुक्तिक कारण कोणीही सांगितलेले नाही. त्यामागचे वास्तवही दडवून ठेवले आहे. प्रत्यक्षात आज सायबर सुरक्षेला भगदाड पाडण्यासाठी स्टेट आणि नॉनस्टेट ऍक्टर दोन्हीही काम करत आहेत आणि बहुतांश ऍक्टर हे डार्कवेबचा वापर करत आहेत.
आपली ओळख लपली जाईल आणि नंतरही अशा प्रकारच्या कुरापती करता येतील, हा यामागचा उद्देश. विशेष म्हणजे अशा घटना घडल्यानंतर त्याचा कोणताही ठोस परिणाम समोर येत नाही. यंदाची घटना पाहता ग्राहकांना, यूजर्सना आपल्या सुरक्षेकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.
दुसरे म्हणजे या प्लॅटफॉर्मवर आपण डोळे बंद ठेवून विश्वास ठेवणे धोकादायक आहे. अनेक लोक या प्लॅटफॉर्मवर अवलंबून राहतात आणि जेव्हा या सेवा काही काळ बाधित होतात, तेव्हा अडचणींचा सामना करावा लागतो. तिसरे म्हणजे आपले बॅकअप तयार असणे गरजेचे आहे. दररोज चोवीस तास हा प्लॅटफॉर्म सुरू राहील अशी आपली इच्छा असते;
परंतु ही बाब शक्य नाही. चौथी गोष्ट म्हणजे अशा घटनांची चौकशी करणे गरजेचे आहे. वेगवेगळे देश आपापल्या पातळीवर तपास करू शकतात. हे काम अमेरिका करू शकते; परंतु या कंपन्या सत्य बाहेर येऊ देत नाहीत आणि ते लपवण्याचाच प्रयत्न करतात. काही गोष्टी उघड झाल्या तर लोकांत भीतीचे वातावरण पसरेल, असे त्यांना वाटत असते.
त्यामुळे आपण नव्या स्वरूपाचे सायबर विश्व समजून घेतले पाहिजे आणि मानसिक रूपाने तयार होणे अपेक्षित आहे. अशा अडचणींना घाबरून न जाता त्यातील बारकावे समजून घेणे आवश्यक आहे. आपल्याला या गोष्टींना आयुष्यात स्थान द्यावे लागणार आहे.
भविष्यात असे आक्रमण आणखी वाढत जाईल. आता खासगी क्षेत्रावर हल्ला झाला आहे. आणखी ते काय काय करू शकतात, ते पाहिले पाहिजे. ते आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर डिजिटल रूपातून नकारात्मरित्या परिणाम करू शकतात. आज जागरूकता वाढवण्याची गरज आहे. नवीन परिस्थिती पाहता आपण पुढे जाण्याची गरज आहे. आपल्याला सायबर सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे. आज या मोठ्या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
उद्या आपल्यासमवेतही होऊ शकते. मग आपण यासाठी तयार आहोत का? अमेरिका दरवर्षी ऑक्टोबर महिना हा राष्ट्रीय सुरक्षा जागरूकता महिना म्हणून साजरा करते. आपणही असे करू शकतो; परंतु आणखी प्रयत्न वाढवण्याची गरज आहे. आपण सायबरच्या समुद्रात उतरलो आहोत आणि आता मागे जाता येणार नाही. यात आपण पारंगत झालो नाही तर बुडण्याची शक्यता राहणारच. आपल्याला डिजिटल कौशल्यावर काम करण्याची गरज आहे.