शर्मिला जगताप
लहानपणापासूनच अंगामध्ये खट्याळपणा असलेला राजू नायक आहे. त्याच्या या खट्याळ स्वभावाला कंटाळून त्याचे वडील त्याला बोर्डिंग हाउसमध्ये टाकतात. वडील गावातील नामवंत कायदेतज्ज्ञ असतात. तर आई महिला मंडळाची कार्यकर्ती. आई-वडिलांना आपापल्या कार्यामुळे आपल्या एकुलत्या एक मुलाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. मुलगा मोलकरणीच्या प्रेमावर वाढतो. आपले उच्च शिक्षण संपवून नायक घरी येतो;
परंतु घरच्या परिस्थितीत काहीच बदल झालेला नसतो. आई-वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेला हा “टीन एजर्स’ मधील नायक शाळेतल्या एका मुलीच्या प्रेमात पडतो. हीच चित्रपटाची नायिका. प्रेम वाढत जाते. हळूहळू प्रगती करीत हे दोघे लग्नाच्या मुद्द्यावर येतात आणि येथेच नायकाच्या वडिलांचा विरोध होतो. नायिका ही हिरोच्या घरच्या मोलकरणीची मुलगी असते, पण हा नायक खचत नाही. नायिकेला घेऊन पळून जातो.
इकडे नायकाच्या व नायिकेच्या वडिलांची जुंपते. पळून गेलेले ते दोघे अनेक संकटांना तोंड देत असतात. शेवटी या दोघांच्या शोधासाठी हिरो-हिरॉईनचे वडील निघतात. हिरो-हिरॉईन एका गुंड टोळीच्या तडाख्यात अडकलेले असतात. त्यातून त्यांची सुटका होते; परंतु हिरो-हिरॉईन आपल्या वडिलांबरोबर परत जाण्यास तयार नसतात. वडिलांना न मानता दोघेही नदीत उड्या टाकतात. शेवटी हिरो-हिरॉईनला त्यांचे वडील वाचवतात व इथेच चित्रपट संपतो.
हिरो-हिरॉईनचे प्रेम जमणे, लग्नाच्या मुद्द्यावर वडिलांचा विरोध, घरातून पळून जाणे, पाठलाग व गोड शेवट अशा स्वरूपाची कथा खूप वेळा पडद्यावर येऊन गेली आहे. तरीही “बॉबी’ पाहताना कंटाळा येत नाही. पुढे होणाऱ्या गोष्टी माहीत असूनही शेवटपर्यंत उत्कंठा राहते हेच
या चित्रपटाचे यश. आजकालचा जमाना “टीन एजर्स’चा आहे. नाच, गाणी, पळापळ, व्हीलन व रोमांस या सर्व गोष्टी “बॉबी’ या चित्रपटात पुरेपूर भरल्या आहेत. राजकपूर यांच्याच शब्दात सांगावयाचे तर ही “आजकालची एक प्रेमकथा’ आहे.
या चित्रपटातील “मै शायर तो नही’, “हमतुम इक कमरेमे बंद हो’, “झूठ बोले कव्वा काटे’, ही गाणी लक्षात राहिली आहेत. नायक व नायिकेच्या भूमिका ऋषी कपूर व डिम्पल कापडिया यांनी सुंदर व सहजरित्या साकार केल्या असून ही जोडीही कायम लक्षात राहिली आहे. ही प्रेमकथा आजच्या काळातही दिसते.