पिंपरी -शहराच्या सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तर काही ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून पाणी येत नाही. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. असे असताना याबाबत प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे दिसून येत आहे.
वारंवार तक्रारी करूनही ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला मूहर्त पाहण्याची आवश्यकता आहे का असा हल्लाबोल स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांनी प्रशासनावर केला.
पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ऍड. नितीन लांडगे होते. यावेळी शहरातील व प्रभागातील सोयी-सुविधांचा उडालेला बोजवारा यावरून सदस्यांनी महापालिका आयुक्त व प्रशासनाला चांगलेच धारेवर धऱले. शहरामध्ये गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे.
याबाबत प्रशासनाकडे यापूर्वीही तक्रार केली आहे. मात्र, प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही परिणाणी ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांची हेळसांड होत आहे. याला पाणीपुरवठा विभागातील निष्क्रिय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप सदस्यांनी केला.
सोसायट्यांच्या टाक्या रिकाम्या
सद्यस्थितीत संततुकारामनगर, भोसरी, पिंपरी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याची टंचाई आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पुरेसे पाणी नागरिकांना मिळत नाही. तसेच यामुळे सोसायट्यांमधील टाक्या रिकाम्या राहतात.
पुढील दोन दिवस पाणी येत नसल्याने उपलब्ध पाणी सोसायटीतील नागरिकांना पुरत नाही. त्यामुळे नागिरकांना मोठ्या पाणी संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यावर पाणीपुरवठा विभाग व स्वतः आयुक्त काही करणार आहेत का असा सवाल सदस्यांनी
यावेळी विचारला.
नोव्हेंबरपासून 24 तास पाणीपुरवठ्याच्या गप्पा
सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. शहरातील नागरिकांना दोन दिवसांनी देखील पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. तर दुसरीकडे आयुक्त राजेश पाटील यांनी नोव्हेंबर महिन्यांपासून दररोज पाणीपुरवठा करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच काही प्रभागांमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाली आहे.
मात्र, नोव्हेंबर पासून दररोज पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. स्थायी समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी हा खुलासा केला. लगेचच सगळ्या भागात पाणीपुरवठा नियमित करणे तेवढे सोपे नसल्याचे त्यांनी सांगितले.
चादरी धुतल्याने टंचाई
पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांनी बैठकीमध्ये हास्यास्पद खुलासा केला. यावेळी प्रवीण लडकत म्हणाले, सध्या सणांचे दिवस आहेत. खासकरून नवरात्रामध्ये दरवर्षीच शहरामध्ये पाणीपुरवठा कमी होत असतो. या काळामध्ये नागरिक घरांची साफसफाई करतात. तसेच चादरी धुण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या काळामध्ये दरवर्षी पाण्याची टंचाई भासते. हे नवीन नाही सण संपल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा दावा लडकत यांनी केला.