नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर घरफोडी करणाऱ्या या चोरांनी उपजिल्हाधिकाऱ्यासाठी एक चिठ्ठीही सोडली आहे. “जर घरात पैसेच नव्हते तर लॉक करायचं नव्हतं कलेक्टर,” असे या चोरांनी चिठ्ठीत लिहिले आहे.
पोलीस अधिक्षकांच्या घरापासून काही अंतरावरच ही चोरी झाल्याने हे पोलिसांसाठी मोठे आव्हान समजले जात आहे. त्रिलोचन गौर यांच्या घरात ही चोरी झाली आहे. देवास येथील खाटेगाव तहसीलमध्ये ते कार्यरत आहेत. गेल्या १५ ते २० दिवसांपासून ते घरी नव्हते. घरातील सामान विस्कटलेलं पाहिल्यानंतर आणि काही रोख रक्कम, दागिने चोरी झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
“३० हजार रोख रक्कम आणि काही दागिने त्रिलोचन गौर यांच्या सरकारी निवासस्थानावरुन चोरीला गेले आहेत. चोरी नेमकी किती वाजता झाली याची माहिती मिळालेली नाही,” असे पोलिसांनी सांगितलं आहे. सध्या याप्रकरणी तपास सुरु आहे.