यवतमाळ – राज्यात भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळातील अखेरच्या काही दिवसांत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, अशी घोषणा केली होती. ती घोषणा चर्चेचा विषय ठरली होती. आता मात्र फडणवीसांनी एका कार्यक्रमात आमचं सरकार येणारच, असल्याचं विधान केलं आहे.
यवतमाळमधील वणी येथे नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फडणवीसांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर कडाडून हल्लाबोल केला.
राज्य सरकार केवळ जीआर आढतं आणि मदतीच्या घोषणा करतं. मात्र निधी देत नाही. मागील दोन वर्षांत सरकारने विकासासाठी कुठलाही निधी दिला नाही. मात्र भाजप सत्तेत आलं की निधी दिला जाईल, असं फडणवीस यांनी म्हटलं.
फणडवीस पुढं म्हणाले की, सध्याचं सरकार काही अजन्म अमरपट्टा घालून आलेलं नाही. आमचं सरकार येणारच आहे. ते कधीही येऊ शकतं. मात्र आम्ही विरोधात असलो तरी आमचं उत्तरदायित्व जनतेशी असल्याचं त्यांनी नमूद केलं. यावेळी फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या मुद्दावर देखील सरकारवर निशाना साधला.