जयपुर – गुजरातमधील अदानी समुहाच्या व्यवस्थापनाखाली बंदरावर 21 हजार कोटी रूपयांचे 3 हजार किलो हेरॉईन सापडले होते. ते प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे नमूद करून कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. यावेळी दिग्विजयसिंह यांनी एक व्हिडीओही पत्रकारांना सादर केला. त्यात भाजपशी संबंधीत लोक मादकद्रव्याच्या व्यवहारात सामिल असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मादक द्रव्यांचा इतका मोठा साठा सापडल्यानंतर त्यावर काय कारवाई केली याची माहितीही केंद्र सरकारने जाहीर करावी असे आव्हानही दिग्विजयसिंह यांनीं केले आहे.
ते म्हणाले की या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. पण एनआयए ही यंत्रणा भाजप नेत्यांना निर्दोष मुक्त करण्यासाठी कार्यरत असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यावर विश्वास ठेवता येत नाही असे ते म्हणाले.
या साऱ्या प्रकरणाची विद्यमान किंवा निवृत्त न्याधिशांच्या नेतृत्वाखाली न्यायालयीन चौकशी करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. मादकद्रव्यांचा चोरटा व्यापार हा दहशतवादापेक्षाही गंभीर आहे कारण त्यातून देशाची युवा पिढी बरबाद होणार आहे असे ते म्हणाले.