अहमदनगर : भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो, त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत केला.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज अहमदनगर येथे आहेत. जलसंपदा विभागाच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेस संबोधित केले.
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र सध्या जाणीवपूर्वक सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. या देशात आणि राज्यात ज्यांनी खरंच आर्थिक गैरव्यवहार केले आहेत ते बाजुलाच राहिले आहेत. ज्यांच्यावर केंद्रीय एजन्सीने ठपका ठेवला ते भाजपमध्ये गेले आहेत, त्यांचे काय झाले हे एकदा ईडीने जनतेला सांगावे, असेही जयंत पाटील म्हणाले.
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत तो मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार नाही. त्यांच्या जावयाने कर्ज काढून त्या जमिनीचा व्यवहार केला आहे. तर दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही कारखान्यात पैसे जमा केले असतानाही मनी लॉन्ड्रिंगचा ठपका ठेवला गेला आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावरही पैसे मागितल्याचा आरोप झाला. हे जाणूनबुजून केले जात असल्याचे जयंत पाटील म्हणाले.