बीड : बीड जिल्ह्यातील विविध जल प्रकल्पांची उंची वाढविण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येतील. यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्याच्या क्षमतेत मोठी वाढ होऊ शकेल, जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात यामुळे वाढ होईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
जिल्ह्यधिकारी कार्यालय येथे जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि.28) रात्री उशिरा बैठक पार पडली. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शिवकन्या शिरसाट, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग सोनवणेे,जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यासह महसूल जिल्हा परिषद जलसंपदा विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जलसिंचन प्रकल्पांमध्ये गाळ साठल्याने त्याच्या पाणी साठ्यावर परिणाम होतो आहे. पाणी साठवण क्षमता वाढवणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील पाणीसाठा क्षमता वाढवण्यासाठी साठवण प्रकल्पांची उंची वाढविण्यासाठी प्राप्त होणारे प्रस्ताव यांचा विचार करून निर्णय घेऊ. सिंचनाचा मुख्य उद्देश कृषी उत्पादनात भरीव वाढ होऊन ग्रामीण जीवन समृद्ध करणे हा आहे त्यामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याच्यादृष्टीने मराठवाड्यात ज्याठिकाणी कामाची आवश्यकता असेल तेथील कामे प्राधान्याने केली जातील असे जलसंपदा मंत्र्यांनी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यातील जलप्रकल्प, त्यांची सुरू किंवा प्रस्तावित असलेली दुरुस्ती व अन्य कामे यासह नवीन प्रस्तावित केलेली कामे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या मागण्या आदी बाबींवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली.
शेतीसाठी पाण्याचे समान वाटप, सिंदफना, माजलगाव आदी प्रकल्पांसह जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांच्या दुरुस्ती कामांचा आढावा आणि निर्माण झालेले अडथळे दूर करून कामे तात्काळ सुरुवात करावी असे निर्देश देण्यात आलेे. यावेळी जयंत पाटील यांनी प्रकल्पाविषयी लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन योग्य ते निर्देश देऊन कामे विहीत मुदतीत पूर्ण करण्यासाठी त्या कामांचा आढावा घेतला.