– हिमांशू
अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सत्ता हस्तगत केल्यानंतरच्या घडामोडी संपूर्ण जगाला हादरवून टाकणाऱ्या आहेत. त्यांच्या क्रौर्याच्या आणि विजयोन्मादाच्या कृत्यांनी सर्व सीमा ओलांडल्या. माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचे बंधू रोहुल्लाह सालेह यांची पंजशीर खोऱ्यात किती निर्दयीपणे हत्या करण्यात आली, हे आता समोर आलंय.
चाबूक आणि वायरने मारहाण केल्यानंतर त्यांचा गळा चिरण्यात आला आणि नंतर तालिबान्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह मागितला, त्यालाही तालिबान्यांनी नकार दिला आणि “त्यांचा देह सडला पाहिजे,’ असं उत्तर दिलं. राष्ट्रपती अशरफ घनी देश सोडून पळून गेल्यानंतर उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी स्वतःला राष्ट्रपती घोषित केलं होतं;
परंतु तालिबान्यांची मुसंडी एवढी जोरदार होती, की त्यांचा प्रतिकार खूपच क्षीण ठरला. विजयाचा जल्लोष साजरा करताना तालिबानी कधी उगीचच गोळीबार करताना दिसले, कधी फनफेअरमध्ये लहान मुलांच्या गाड्यांमध्ये बसून खेळताना दिसले तर कधी विमानाच्या पंखाला झोपाळा बांधून झुलताना दिसले.
क्रौर्य आणि उन्माद इतका अतिरेकी कसा काय असू शकतो? असाच प्रश्न जगाला पडलाय. परंतु तरीही काही देशांनी तालिबानच्या राजवटीला मान्यता द्यायचं ठरवलंय. अनेक देश अद्याप निर्णय घेण्याच्या किंवा प्रतिक्रिया देण्याच्या स्थितीतच नाहीत. अफगाणिस्तानात जे काही घडलं त्याचा वेग इतका प्रचंड होता, की जगभरात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं.
तालिबान्यांचं क्रौर्य आणि उन्माद याच्याही पलीकडे अफगाणिस्तानात समस्यांचे महाराक्षस उभे आहेत आणि त्यातून अफगाण नागरिक कसे बचावणार, असा प्रश्न जगाला पडलाय. तालिबानच्या राजवटीला मान्यता देणं-न देणं यापेक्षाही महत्त्वाचं बरंच काही आहे आणि आर्थिक कंगाली आणि भूकेमुळे मरायचं की तालिबान्यांच्या गोळ्या खाऊन मरायचं, याहून वेगळा पर्याय नसलेल्या जनतेचं काय होत असेल,
याची कल्पनाही आपण करू शकणार नाही. तिथल्या हलाखीच्या परिस्थितीचं एक हृदयद्रावक प्रातिनिधिक उदाहरण नुकतंच समोर आलंय. पोलीस दलात काम करणाऱ्या एका व्यक्तीला सत्तांतरानंतर नोकरी गमवावी लागली. सात जणांच्या कुटुंबाला कसं जगवायचं, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला. बचत संपल्यानंतर घरच्यांची परिस्थिती त्याला बघवेना. हमाली, मजुरी अशी सगळी कामं करून झाली; पण नंतर तीही मिळणं बंद झालं.
त्याच वेळी त्याला एक व्यापारी भेटला. त्याला मूलबाळ नाही. व्यापाऱ्यानं पोलिसाची चार वर्षांची मुलगी विकत घेण्याची तयारी दर्शविली. कुटुंबाला वाचवण्यासाठी बापानं मुलीची विक्री करायचं निश्चित केलं. याही व्यवहारात घासाघीस सुरू झाली. बाप मुलीची जेवढी किंमत मागत होता, तेवढी द्यायला व्यापारी तयार नव्हता. परंतु परिस्थिती अनुकूल होईपर्यंत कुटुंबाला जगवण्यासाठी जास्तीत जास्त पैसे हवे होते.
ज्याला आपला पोटचा गोळा विकावा लागतो; नव्हे त्याच्या किमतीसाठी घासाघीस करावी लागते, त्याच्या हतबलतेला काय म्हणायचं? भविष्यात हा बाप पैसा जमा करून व्यापाऱ्याला परत देणार आहे. पैसे दिले तर मुलगी परत द्यायचं आश्वासन व्यापाऱ्यानं दिलंय. असं खरंच होईल का? किती वर्षे लागतील त्यासाठी? त्यावेळी मुलगी किती वर्षांची असेल? ती पित्याबरोबर जाईल का? मुख्य म्हणजे, अशा किती दुर्दैवी घटना अफगाण भूमीत सध्या घडत असतील?