आचार्य अत्रे
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे व्यक्तिमत्त्व अनेक क्षेत्रांत प्रभावी आकर्षक असे होते. कोणत्याही क्षेत्रात पदार्पण केले आणि त्यात त्यांनी अग्रेसरत्व प्राप्त करून घेतले नाही असे अत्रे यांच्या बाबतीत घडलेच नाही. त्यांचा मूळचा पिंड साहित्यिकाचा; परंतु ते पत्रकार बनले व त्यात त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
अत्रे हे मूळचे शिक्षक; पण ते नाटककार झाले आणि त्यात त्यांनी मोठा लौकिक संपादन केला. चित्रपटकथाही त्यांनी लिहिल्या व त्या अतिशय लोकप्रिय झाल्या. नुसते विनोदी वक्ते म्हणून ते जगापुढे राहिले असते व वावरले असते तरी त्यांनी पुरेसा लौकिक संपादन केला असता. ते यशस्वी पत्रकार तर होतेच पण यशस्वी चळवळ-आंदोलकही होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी केलेली कामगिरी अविस्मरणीय ठरणारी आहे.
“यं देशं श्रयते तमेव कुरुते बाहुप्रतापार्जित्म’ असे आचार्य अत्रे यांच्या बाबतीत सर्वार्थाने व पूर्णार्थाने म्हणता येईल. इतकी नाना अवधाने ते कशी सांभाळू शकतात याचे आश्चर्य वाटते. त्यांची स्मरणशक्ती दांडगी होती. श्रमजीवी जनतेविषयी वाटणारी आस्था भरपूर होती. सामाजिक अथवा राजकीय अन्यायाचा द्वेष उपजत होता. त्याच्या प्रतिकारार्थ लेखणी उचलताना, वाणी वापरताना मागचा पुढचा विचार करणे त्यांना माहीत नव्हते.
साहित्यिक म्हटला म्हणजे सामान्यतः जपून लिहिणारा, तोलून बोलणारा, विशेषतः सत्ताधाऱ्यांच्या शेपटीवर पाय पडणार नाही अशी दक्षता घेणारा असावयाचा; परंतु आचार्य अत्रे हे त्या नियमाला अपवाद होते. अन्याय दिसला रे दिसला की, अत्र्यांनी त्यावर प्रहार केलाच. राज्यकर्ते व राज्यकर्ता पक्ष त्यांच्यावर सतत नाराज असावयाचा. पण त्या नाराजीची पर्वा अत्रे करतात कशाला?
स्वभाविकपणे अत्र्यांशी ज्यांची तुलनासुद्धा करता येणार नाही अशा दुय्यम, तिय्यम असामी पद्मश्री, पद्मभूषण बनून गेल्या. परंतु अत्र्यांना तशी एखादी पदवी देऊ करण्याची बुद्धी राज्यकर्त्यांना झाली नाही. तशी वासना राज्यकर्त्यांच्या ठायी उद्भवली असती तरी अत्र्यांनी ती पदवी स्वीकारली नसती. कारण अत्र्यांची थोरवी स्वयंसिद्ध होती. तिला खुलविण्यासाठी पदवीचे पुच्छ कशाला हवे?