नवी दिल्ली, दि.9- खाद्य तेलाच्या किमती काही प्रमाणात वाढल्या आहेत. या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार आवश्यक ते प्रयत्न करीत आहे. दैनंदिन पातळीवर खाद्य तेलाच्या किमतीकडे लक्ष दिले जात आहे. आवश्यकता भासल्यास आयात वाढविण्यावर विचार चालू असल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.
सध्या खाद्य तेलाचे दर जास्त आहेत. म्हणून केंद्र सरकारने खाद्यतेलाची आयात व्हावी याकरिता काही खाद्य तेलावरील आयात शुल्कात कपात केली आहे. आगामी काळात बरेच सण येणार आहेत. त्यामुळे खाद्य तेलाच्या किमती वाढू नयेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. खाद्य तेलाचे उत्पादन, आयात आणि किमती याकडे दैनंदिन पातळीवर लक्ष दिले जात आहे.
कृषी उत्पादनाच्या किमतीवरील आंतर मंत्रालयीन समितीचेही या घटनाक्रमाकडे लक्ष आहे. ग्राहक, उत्पादक, शेतकऱ्यांचे हितसंबंध जोपासले जावे त्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
खाद्य तेलाबरोबरच डाळी आणि इतर कृषी उत्पादनाच्या किमतीकडे गेल्या एक वर्षापासून सरकार लक्ष देऊन आहे आणि आवश्यक वेळी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भारतात गरजेच्या 60 टक्के इतके खाद्यतेल आयात केले जाते. त्यामुळे आयात योग्य प्रमाणात योग्य वेळी होत आहे काय याकडे लक्ष दिले जात आहे.
ब्राझील, अर्जेंटिना, मलेशिया, इंडोनेशिया या देशातून खाद्य तेलाची आयात केली जाते. देशातील तेलबियांचे उत्पादन वाढवावे याकरिता केंद्र सरकार प्रयत्नशील असून मोहरीच्या तेलाचे उत्पादन विक्रमी पातळीवर गेले आहे.