राजगुरूनगर (प्रतिनिधी):- राजगुरूनगर जवळच्या बोरदरा- साबळेवस्ती वडगांव पाटोळे, (ता.खेड) येथे बिबट्याने घरात झोपलेल्या महिलेवर हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि १) उघडकीस आली. जनाबाई रामचंद्र पाटोळे-गडदे (वय ५५ )असे बिबट्या च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध महिलेचे नावं आहे.
याबाबतची माहिती अशी की, वडगांव पाटोळे मधील बोरदरा- साबळे वस्ती मध्ये माहेरी राहत असलेल्या जनाबाई रामचंद्र पाटोळे-गडदे (वय ५५) येथे ही महिला रहात होती. त्यांच्या भावाचे येथे घर असुन जवळच असलेल्या झोपडीत महिला वास्तव्यास होती. नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि ३१)रात्री झोपल्यावर मध्यरात्री बिबट्या झोपडीत शिरला. झोपेत असलेल्या जनाबाई यामच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले. झोपडी पासुन सुमारे ४०० फुट अंतरावर शेतात ओढून नेऊन त्यांचे अर्धवट शरीर बिबट्याने खाल्ले असल्याचे आढळुन आले.
सकाळी नेहमीप्रमाणे कुटुंबातील सदस्यांनी चौकशी केली असता जनाबाई आढळुन आल्या नाही. कुठे गेल्या असतील म्हणून काही काळ दुर्लक्ष झाले. मात्र चौकशी केली तेव्हा ही घटना समोर आली. झोपडी पासुन ४०० फुटांवर शेतात मृतदेह मिळुन आला असुन मयताचे हातपाय बिबट्याने खाल्ले आहेत. वनविभागाने पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदन साठी पाठवण्यात आला आहे.
वडगांव पाटोळे परिसरात गेले तीन महिने एक,दोन बिबट्याचा तसेच त्यांच्या बचड्यांचा वावर आहे. रस्त्यावर एका महिलेला अचानक आडवा आला. दुचाकी स्वारावर हल्ला चढवला. त्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. यासारख्या अनेक घटना घडल्या होत्या.यामुळे गाव आणि परिसरात भीतीचे वातावरण होते.आतापर्यंत ७ व्यक्तींवर बिबट्याने हल्ला केला आहे. त्यामुळे लोकं दिवसा शेतात किंवा कामानिमित्त बाहेर पडायला घाबरत आहेत.या घटनांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने एकदा पिंजरा लावला होता. त्यात एक बिबट्या अडकला.तरीही बिबट्याचे दर्शन अनेकांना झाले होते. भीतीने नागरिकांना ग्रासलेले असताना आजच्या घटनेने चिंता वाढली आहे.
वडगांव पाटोळे गावचे माजी सरपंच सागर पाटोळे यांनी सांगितले, परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे अनेकजण सांगत होते. गेल्या दोन महिन्यात सात नागरिकांवर हल्ला झाला. बिबट्या आहे. त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. आजच्या पहिल्या नरबळीने तरी प्रशासनाला जाग येईल या नरभक्षक बिबट्याला तत्काळ जेरबंद करावे अशी सर्वांची मागणी आहे