लीड्स – भारत आणि इंग्लंड यांच्यात येथील हेडिंग्ले मैदानावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंडच्या प्रेक्षकांची वाईट वर्तवणूक पुन्हा एकदा पाहायला मिळाली.
या सामन्यात इंग्लंडचा संघ फलंदाजी करत असताना भारताचा वेगवान गोलंदाज महंमद सिराज सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत होता. क्षेत्ररक्षण करताना सिराजला उद्देशून प्रेक्षकांनी शेरेबाजी केली. मात्र, सिराजनेही त्यांना जशास तसे उत्तर दिल्याने त्याचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. प्रेक्षकांच्या गैरवर्तनाची तक्रार सिराजने पंचांकडे केली. जेव्हा कर्णधार विराट कोहलीला या गोष्टीची माहिती मिळाली, तेव्हा तो संतापला व त्यानेही याबाबत पंचांशी चर्चा केली.
सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने भारतीय संघाचा डाव 78 धावांवर गुंडाळला. त्यानंतर भारतीय संघ गोलंदाजीसाठी मैदानात आला होता. भारतीय संघाची पहिल्याच दिवशी झालेली ही अवस्था पाहून इंग्लंडचे चाहते खूप आनंदी होते. यादरम्यान मैदानातील काही प्रेक्षकांचे भारतीय खेळाडूंसोबतचे वर्तन खूपच चुकीचे झाले. सिराज सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षकांनी त्याच्याकडे गुलाबी चेंडू (पिंक बॉल) फेकला. त्यांच्या या गैरवर्तनानंतर सिराजने पंचांकडे तक्रार केली.
सिराजने इंग्लंडच्या प्रेक्षकांच्या या वागणुकीचे चोख उत्तरही दिले. त्याने मैदानातील उत्साहात असलेल्या प्रेक्षकांना इशारा करत या गोष्टीची आठवण करून दिली की, भारतीय संघ मलिकेत 1-0 असा आघाडीवर आहे. जेव्हा या सगळ्या गोष्टीची माहिती कोहलीला मिळाली, तेव्हा त्याने प्रेक्षकांमधून आलेल्या गुलाबी चेंडूला परत त्यांच्याकडे फेकण्यासाठी सांगितले. कोहलीदेखील प्रेक्षकांच्या या गैरवर्तनामुळे संतापल्याचे पाहायला मिळाले.