नवी दिल्ली – परदेशातून होणारी थेट परकीय गुंतवणूक मे महिन्यामध्ये 12.1 अब्ज डॉलरपर्यंत वाढली असल्याचे केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
भारतामध्ये गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे परकीय गुंतवणूक वाढत आहे.
केंद्र सरकारने गेल्या सात वर्षांमध्ये या क्षेत्रात केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे परदेशी गुंतवणूकदारांना भारतीय गुंतवणूक सुरक्षित वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आगामी काळात भारताची निर्यात वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. 2021-22 मध्ये गुंतवणुकीचे लक्ष्य 400 अब्ज डॉलर इतके करण्यात आले आहे.
करोना व्हायरसचा प्रभाव संपुष्टात आल्यानंतर भारतातून होणाऱ्या निर्यातीत वेगाने वाढ होत आहे. भारतामध्ये स्टार्टची संख्या वाढत असून त्यांच्याकडून रोजगार निर्मिती होत आहे. सध्या 54,000 स्टार्टअप साडेपाच लाख लोकांना रोजगार देत आहेत. पुढील पाच वर्षात आणखी 50 हजार नवीन स्टार्टअप सुरू होतील व त्यांच्याकडून होणारी रोजगारनिर्मिती 20 लाखापर्यंत जाणार आहे.
जगातील मोठ्या कंपन्या आता चीनऐवजी इतर देशातून आयात करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याचा फायदा भारतीय उद्योगांनी घेण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक ती मदत केंद्र सरकार करण्यास तयार आहे. भारतामधून मोठ्या प्रमाणात औषधांची निर्यात होत आहे. आगामी काळात भारत औषध निर्मितीचे केंद्र होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतामध्ये वाहन उद्योगही मोठ्या प्रमाणात एकवटला आहे. आगामी काळात भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मिती वाढावी यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केंद्र सरकार करत आहे. त्यासंदर्भात भारतातील कंपन्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. सध्या जगभरामध्ये सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही भारतीय उद्योगाच्या दृष्टिकोनातून चांगली संधी आहे. या संधीचा उपयोग भारतातील उद्योगानी करावा असे त्यांनी सांगितले.