सिमला – हिमाचल प्रदेशच्या लाहौल आणि सिप्ती जिल्ह्यांत मोठे भूस्खलन झाल्याने शुक्रवारी चिनाब नदीचा प्रवाह रोखला गेला. मात्र, यात कोणतीही जीवितहानी झाल्याचा तपशील तातडीने उपलब्ध होऊ शकला नाही.
मात्र या भागातून सुमारे दोन हजार जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे संचालक सुदेशकुमार मोक्ता म्हणाले, स्थानिक प्रशासन परिस्थितीचा आढावा घेत आहे. या विभागात राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाला तैनात करण्यात आले आहे.
सध्या नदीचा प्रवाह रोखला गेला आहे. केवळ 10 ते 15 टक्के पाणी पुढे जात आहे, त्यामुळे गावांचे स्थलांतर करण्यात आले आहे, हेलिकॉप्टरच्या मदतीने हवाई टेहळणी करण्यात येत आहे.
कन्नौर मृतांची संख्या 15 वर
हिमाचल प्रदेशच्या कन्नौर जिल्ह्यात अलीकडेच दरड कोसळून किमान 15 जणांचा मृत्यू झाला होता. अद्याप 13 जणांना राडारोड्या खालून बाहेर काढले असले अद्याप 15 जण अडकले असण्याची भीती आहे.
त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.दरम्यान मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी भाबागनगर येथील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
त्यांनी या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत जाहीर केली. तर गंभीर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देऊ केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाखाची तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.