मुंबई: किरकोळ कारणातून वाद झाल्यानंतर मला तुझी गरज नाही, तू मरून जा असे उद्गार प्रेयसीने काढल्यामुळे मुंबईत एका तरुणाने खरोखर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित तरुणाने फेसबुक लाइव्ह करत आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
प्रेयसीने छळामुळेच तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणाचा तपास सुरू आहे. माझी प्रेयसी पहिल्यासारखा प्रतिसाद देत नाही. याबाबत विचारणा केली असता, तरुणीने मला तुझी गरज नाहीये, तू मरून जा…असे म्हटल्यामुळे मुंबईतील एका तरुणाने आत्महत्या केली आहे.
अंकुश नामदेव पवार असे आत्महत्या करणाऱ्या 27 वर्षीय तरुणाचे नाव असून तो मुळ जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्याच्या पिंपळगाव रेणुकाई येथील रहिवासी आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मृत अंकुश हा चार वर्षांपूर्वी कामाच्या शोधात मुंबईला आला होता. येथे आल्यानंतर कल्याण येथील एका खाजगी रुग्णालयात त्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. सुरुवातीला सर्वकाही ठिक सुरू होते.
दरम्यान त्याची ओळख एका घटस्फोट झालेल्या तरुणीशी झाली. कालांतराने त्यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघं एकमेकांशी लग्नही करणार होते. मागील तीन वर्षांपासून अंकुशचे संबंधित तरुणीशी प्रेमसंबंध सुरू होते.
लग्न करण्यासाठी अंकुश आपल्या कमाईचे पैसे प्रेयसीकडे जमा करून ठेवत होता. पण जमा केलेले पैसे प्रेयसी पार्टी आणि मौज करण्यासाठी उडवत असल्याची माहिती अंकुशला मिळाली. यामुळे अंकुशने आपल्या प्रेयसीला याबाबत विचारणा केली. यातून दोघांत खटके उडू लागले. तिने अंकुशला उद्धटपणे उत्तरे द्यायला सुरू केली. प्रेयसीचे वागणे जिव्हारी लागल्याने त्याने मरुन जाण्याची धमकी दिली. प्रेयसीने देखील तू मरून जा, मला तुझी गरज नाही असे सुनावले. प्रेयसीने रागात बोललेल्या वाक्यामुळे अंकुशने डोक्यात राग धरून फेसबुक लाईव्ह करत आपले आयुष्य संपवले असल्याचे सांगण्यात येत आहे.