– माधव विद्वांस
शकील या शब्दाचा उर्दूतील अर्थाप्रमाणे रुबाबदार देखण्या शायर शकील बदायुनी यांचा आज जन्मदिन. कोणताही चित्रपट कथानक, कलाकार व त्यांचा अभिनय यामुळे आकार घेतो. मात्र, नृत्य तसेच गाण्याने तो सजवला जातो. अलीकडच्या चित्रपटातील गाणी आणि पूर्वीच्या चित्रपटातील गाणी यात खूप फरक आहे.
शकील बदायुनीसारख्या शायरांनी कथानकातील प्रसंगानुरूप अतिशय अर्थपूर्ण भावपूर्ण गाणी दिली. त्यांचे योगदान रसिकांच्या हृदयावर आजही कोरलेले आहे. उत्तर प्रदेशातील बदायू येथे 3 ऑगस्ट, 1916 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे संगोपन व शिक्षण उर्दूची पंढरी लखनौसारख्या शहरात झाले.
त्यांचे वडील महंमद जम्मल अहमद कादरी यांनी त्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून अरबी, उर्दू, फारसी आणि हिंदी शिकविण्याची व्यवस्था केली. त्यांचे दूरचे नातेवाइकांपैकी झिया-उल-कादिरी बदायुनी धार्मिक शायर होते. त्यांचा शकील यांच्यावर प्रभाव पडला होता. 1936 मध्ये त्यांनी अलिगढ मुस्लीम विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी विद्यापीठांतर्गत मुशायऱ्या (काव्य स्पर्धा) मध्ये भाग घेऊन अनेक स्पर्धा जिंकल्या व ते शायर म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे काव्य अर्थपूर्ण व प्रेमरसाने हृदयाला भिडणारे होते.
वर्ष 1940 मध्ये त्यांनी दूरच्या नात्यातील परंतु जवळच राहणाऱ्या सलमा हिचेबरोबर विवाह केला. अलिगढमधून बी.ए. पास झाल्यानंतर ते चरितार्थासाठी वर्ष 1942 मध्ये दिल्लीला आले. तेथे त्यांची पुरवठा विभागामध्ये पुरवठा अधिकारी म्हणून नेमणूक झाली. नोकरी करीत असताना त्यांचे मुशायऱ्यात भाग घेणे चालूच होते. शायरीच्या ओढीने त्यांनी पुरवठा विभागाचे काम सोडले आणि 1946 मध्ये ते दिल्लीहून मुंबईत आले.
मुंबईत आल्यावर चित्रपट निर्माते ए. आर. करदार आणि संगीतकार, नौशाद यांना ते भेटले. त्यांनी त्यांची परीक्षा घेण्यासाठी एका कवितेची ओळ करण्यास सांगितले. त्यांनी लगेचच “हम दर्द का अफसाना दुनिया को सुनना देंगे, हर दिल में मोहब्बत की एक आग लगा देंगे’ अशी ओळ लिहून दिली. या एकाच ओळीमुळे त्यांच्यातील शायराची ओळख पटली व लगेचच निर्माते करदार यांच्या “दर्द’ या चित्रपटासाठी वर्ष 1947 मध्ये करारबद्ध केले. या चित्रपटातील “अफ़साना लिख रही हूँ दिल-ए-बेक़रार का’ हे गीत त्यावेळी उमादेवीने (टुणटुण) गायले. त्यानंतर त्यांनी अनेक भावपूर्णगीते तसेच भक्तिगीते गायली.
शकील बदायुनी यांनी जवळजवळ तीन दशकांच्या कारकिर्दीत 90 चित्रपटांसाठी गीते लिहिली. त्यांची कारकीर्द पाहता जास्त करून त्यांनी संगीतकार नौशाद यांचेबरोबर काम केलेले दिसून येते. त्यांनी गायलेल्या “चौदहवीं का चांद हो या आफताब हो (चित्रपट चौदहवीं का चांद), हुस्न वाले तेरा जवाब नहीं (घराना), कहीं दीप जले कहीं दिल (बीस साल बाद) या गीतांना फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाले.
“बीस साल बाद’, “बैजू बावरा’, “कोहिनूर’, “मुघल-ए-आझम’, “साहिब बीबी और ग़ुलाम’, अशा अनेक चित्रपटांना त्यांनी लिहिलेल्या गीतांमुळे जणू “चार चॉंद लग गये’. “मुघल-ए-आझम’मधील “प्यार किया तो डरना क्या’ तसेच “मदर इंडिया’मधील “दुनिया में हम आये हैं तो जीना ही पडेगा’ ही गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. 20 एप्रिल, 1970 रोजी त्यांचे निधन झाले.