इस्लामपूर(विनोद मोहिते, प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णा व वारणा नदीला महापूर आला आहे. कृष्णा व वारणा काठावरील 28 गावातील 2 हजार 876 कुटुंबातील 16 हजार 860 व्यक्तींचे प्रशासनाकडून स्थलांतरित करण्यात आले आहे.
रात्री उशिरापर्यंत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत होते. पहाटे ताकारी तर शुक्रवारी रात्री आठ वाजता बहे पूल पाण्याखाली गेला आहे. नदी काठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नागरिकांसह जनावरांचेही स्थलांतर करण्याचे काम सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत 4 हजार 352 जनावरांचे स्थलांतर झाले होते.पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने आशियाई मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर च्या दिशेने जाणारी वाहने कणेगाव,वाघवाडी व येवलेवाडी फाटा येथे बॅरिगेट लावून थांबवण्यात आली आहेत.
वाळवा तालुक्यातील कृष्णा काठावरील बोरगाव, जुनेखेड, मसुचीवाडी, ताकारी, दुधारी, बिचुद, रेठरेहरणाक्ष, फार्णेवाडी, गौडवाडी, बनेवाडी, साटपेवाडी, बहे, तांबवे, शिरटे, हुबालवाडी, वाळवा, शिरगाव तर वारणा काठावरील तांदुळवाडी, कणेगाव, भरतवाडी, कुंडलवाडी, चिकुर्डे, ठाणापुढे, ऐतवडे खुर्द, शिगाव, कृष्णानगर या २८ गावांमधील नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
आज वाळवा, शिरगाव येथील नागरिकांना बोटीने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
शुक्रवारी पहाटे कृष्णा नदीवरील ताकारी पूल पाण्याखाली गेला असून बहे पुलही सुरक्षिततेच्या कारणास्तव बॅरिगेट लावून बंद करण्यात आला. त्यामुळे वाळवा तालुक्याचा नदीच्या पलीकडील गावांशी संपर्क तुटला आहे.
कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना धरणातून 50 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा काठावरील नागरिकांना धास्ती लागली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा हे पाणी वाळवा तालुक्यात पोहोचणार असल्याने बहे पूलही पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृष्णा काठावरील गावातील नागरिक व जनावरांचे स्थलांतरित सुरू आहे.
इस्लामपुरात दहा ठिकाणी पूरग्रस्तांना राहण्याची व्यवस्था…!
वाळवा तालुक्यातील स्थलांतरित पूरग्रस्तांसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध सभागृहे, मंगल कार्यालयात ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे पूरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शहरातील सिद्धनाथ, परदेशी,डायमंड हॉल, निर्मला व विजया संस्कृती भवन, मुलींचे शासकीय मुलींचे वसतिगृह,मॉडर्न हायस्कूल आदी ठिकाणे व्यवस्था करण्यात आली आहे. तर खुले नाट्यगृह,योग भवन, जयंत पाटील सभागृहात नगरपालिका प्रशासनाने व्यवस्था करीत असल्याचे तहसीलदार यांना पत्र दिले आहे.
वाळवा तालुक्यात पाऊसाचा जोर वाढला वारणा काठावरील कणेगाव व भरतवाडी गावात 2019च्या पुराची पूनरावृत्ती झाली आहे. तर कणेगाव गावाला वारणा नदीच्या पाण्याने चारी बाजूने घेरले असून गावातील मराठी शाळेसह संपूर्ण गावात पाणी शिरल्याने जनावरे सहित संपूर्ण गाव स्थलांतरित केले आहे. गुरुवारी रात्री अचानकपणे पाणी वाढल्याने मागील पूराच्या तुलनेत ही पूरपरिस्थिती भयानक असल्याचे नागरीकातून बोलले जात आहे.
कणेगाव व भरतवाडी हे दोन गावे नदी किनारी असल्याने या गावांना दरवर्षी पुराच्या संकटाना तोंड द्यावे लागते. शुक्रवार (दि. २३ रोजी) सकाळ पासूनच गावात पाणी शिरत असल्याने नागरिकांनी संसारोपयोगी साहित्यसह जनावरे घेऊन पुणे-बेंगलोर आशियायी महामार्गावर ठिय्या मारला होता. यामुळे राष्ट्रीय महामार्गाला छावनीचे स्वरूप प्राप्त झाले होते. कणेगाव फाट्यावरील वारणा नदीचे पाणी जुन्या पुलाला घासून चालले असल्याने वाहतुकीसाठी जुना पूल बंद करण्यात आला आहे. तर कणेगाव येथील नागरिकांनी आपापल्या सोईनुसार पै-पाहुण्यांकडे आसरा घेतला आहे.