मेढा – रेंगडेवाडी (ता. जावळी) येथील शेतकरी कटुंबातील पाच जण सायंकाळी भात लावणी करुन आपल्या शेतातून घराकडे जात असताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेले. यापैकी एक जण बचावले तर चार जण पाण्यात वाहून बेपत्ता झाल्याची घटना घडली असल्याची माहिती तहासीलदार राजेंद्र पोळ यांनी दिली.
रेंगडीवाडी येथील ओढा वेण्णा नदीला जावून मिळतो. वेण्णा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडून तिला महापूर आल्याने सर्व गाव गडद छायेखाली आहे. हा ओढा पार करत असतांना यामध्ये दोन पुरुष व दोन महिला वाहून बेपत्ता झाल्या असून यामध्ये सहदेव गणपत कासुर्डे (वय 60), भागाबाई सहदेव कासुर्डे (वय 50), तानाबाई किसन कासुर्डे (वय 50), रवींद्र सहदेव कासुर्डे (वय 30) यांचा समावेश आहे.
रेंगडीवाडी गाव जावळी व महाबळेश्वर तालुक्याच्या हद्दीवर असल्याने व या गावाकडे जाणाऱ्या मेढ्यातून केळघर मार्ग वाहतूक अडचणीची व ठप्प झाल्याने महाबळेश्वरचे महसूल प्रशासन घटनास्थळी पोहचले आहे. गेली दोन दिवस तालुक्यात अतिवृष्टी होत असून नागरिकांनी व शेतकऱ्यांनी नदी, ओढा व नाले ओलांडून जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी केले आहे.