सांगली : भाजपचे मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी कोरोना निर्बंधांवरुन दंगलीचा अप्रत्यक्ष इशारा देत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. करोनाचे संकट संपत आले असताना, आता प्रशासन व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याच्या आड आले, तर वाद विकोपाला जाईल; कदाचित दंगलही होईल; आणि मिरजेला दंगल काही नवीन नाही, असं भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
कडक निर्बंधाला विरोध दर्शवताना भाजपचे मिरजेचे आमदार सुरेश खाडे यानी हे वक्तव्य केले आहे. कोरोना रोखण्यात जिल्हा प्रशासन, शासन अपयशी ठरले आहे. शुक्रवार, दि. 23 जुलै रोजी सांगली जिल्ह्यात मिरजेसह सर्वत्रच दुकाने उघडणार असा इशारा दिला आहे. सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज शहरातील व्यापाऱ्यांची बैठक घेतली, तेव्हा ते बोलत होते.
मिरजेत गेले कित्येक दिवस व्यापारी दुकाने उघण्याची शासनाला परवानगी मागत आहेत. पण लॉकडाऊन कडक निर्बंध लागू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही. दोन वेळा निर्बंध डावलून दुकाने उघण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांनी केला, पण पोलीस व महापालिका पथकाच्या भीतीने दुकाने पुन्हा बंद केली.
आता खाडे यांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शुक्रवारी दुकाने उघण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले. जिल्हा प्रशासन राज्य सरकार कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी निष्क्रिय ठरले आहे. शुक्रवारी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्यानंतर कारवाई केली तर मिरजेतील कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे.