– रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – भीमाशंकर आणि परिसरात मागील १८ तासात झालेल्या अतिवृष्टमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले तर तालुक्यातील कळमोडी धरण १०० टक्के भरले आहे, चासकमान व भामाआसखेड धरणाच्या पाणी साठ्यात सुमारे एक टीएमसी ने वाढ झाली आहे.
गेली अनेक दिवसांच्या विश्रांती नंतर भीमाशंकर परिसरासह तालुक्यात मागील १८ तासात जोरदार पाऊस झाला.तालुक्यातील भीमाशंकर भोरगिरी परिसरात ३३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
अतिवृष्टीमुळे भोरगिरी परिसरातील भात खाचरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले भात खाचरे फुटून लावणी केलेल्या भात रोपे गाडली गेली आहेत. नायफड येथील तलाव कम माती बंधारा फुटला.
भिवेगाव, भोमाळे, टोकावडे, मंदोशी, मोरोशी, खरपूड, कुडे, नायफड,भोरगिरी, कारकुडी, धामणगाव खुर्द, शिरगाव या गावांच्या परिसरात पावसाने मोठे नुकसान झाले आहे. गेली चार पाच दिवस पडणाऱ्या तुरळक पावसावर शेतकऱ्यांनी भात रोपे उपटून त्याची आवणी(लावणी) केली होती.
मात्र काल दिवसभर झालेल्या अतिवृष्टीमुळे भात आवणी केलेले भात पीक वाहून गेले काही ठिकाणी बांध फुटल्याने मातीखाली गाडल्याने नुकसान झाले आहे. खेड तालुक्यातील तीन धरणांपैकी कळमोडी धरण १०० टक्के भरले आहे.
या परिसरात सुमारे २५०मिमी पावसाची नोंद झाली. चास कमान धरण परिसरात सुमारे १००मिमी पाऊस पडला भीमाशंकर परिसरात झालेल्या अतिवृष्टमुळे धरण साठ्यात १टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा वाढला आहे. चासकमान धरणात ४५ टक्के भरले आहे.
पुण्याला पाणी पुरवठा करणारे भामा आसखेड धरण क्षेत्रात आंबोली परिसरात अतिवृष्टी झाल्याने भामाआसखेड धरणाच्या पाण्यातही वाढ झाली आहे. ५०% धरण भरले आहे.
भीमाशंकर भोरगिरी परिसरात झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे भीमा नदीला महापूर आल्याने पाभे गावात पाणी शिरले होते.
भोमाळे, पाभे गावातील भिमानदिवरील दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने पुलाचे कठडे तुटले, संरक्षक खांब वाहून गेले. दरम्यान पावसाचा जोर कमी झाला असून भिमानदीचा पूर ओसरला आहे. मंदोशी गावाच्या जावळेवाडीतील नवा पूल वाहून गेल्याने नागरिकांना जाण्यायेण्यासाठी रस्ता बंद झाला आहे.