नवी दिल्ली – देशात लसीकरणाचाही जुमलाच बघायला मिळाला असल्याची टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली असून लस कोठे आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. दिल्लीसह अनेक राज्यांतील लसीकरण बंद करावे लागले असल्याचे वृत्त काही ठिकाणी प्रकाशित झाले आहे.
त्याची कात्रणे जोडून राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की जमुले है, व्हॅक्सिन नहीं! व्हॅक्सिन कोठे आहे? असा हॅशटॅगही त्यांनी चालवला आहे. देशाच्या अनेक भागात लसीकरणाचा वेग पुन्हा ढेपाळला आहे. लसींचा पुरवठा कमी पडत असल्याची सार्वत्रिक तक्रार आहे. पण त्याबाबत आरोग्य मंत्रालयाने किंवा केंद्र सरकारने कोणताही खुलासा केलेला नाही.
राज्यांना ज्या प्रमाणात लस पुरवण्याची ग्वाही केंद्रातर्फे दिली जाते तितक्या प्रमाणात प्रत्यक्षात लसी मात्र पोहोचत नाहीत, असाही अनेक राज्यांतला अनुभव आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही टीका केली आहे.