पुणे -महापालिका हद्दीत नव्याने 23 गावे समाविष्ट होताच पालिकेने शहरासाठी वाढीव पाणी मिळावे यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या गावांसह, शहरासाठीची पाण्याची गरज भागविण्यासाठी मुळशी धरणातून पाच टीएमसी पाण्याची मागणी करण्यात येणार आहे. याबाबतचा, प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला असून त्यानंतर तो शहर सुधारणा समितीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे.
राज्यशासनाने महापालिकेसाठी 11.50 टीएमसी पाणीसाठा निश्चित केला आहे. तर, महापालिकेने शहराची वाढती लोकसंख्या आणि 23 गावांच्या समावेशानंतर लागणारे पाणी ही बाब लक्षात घेऊन गावे घेण्यासाठीचा अभिप्राय देताना 18.50 टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. सद्यस्थिती महापालिका प्रत्यक्षात 15 टीएमसी पाणी खडकवासला धरणातून घेत आहे.
ग्रामपंचायतीकडून 23 गावांमध्ये दरडोई 55 लीटर पाणी दिले जात होते. मात्र, आता पालिकेस पालिकेच्या नियमानुसार, दरडोई 135 लीटर पाणी द्यावे लागणार आहे. त्यामुळे महापालिकेस शहरासाठी आणखी तीन ते चार टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
हे वाढीव पाणी मुळशी धरणातून द्यावे, अशी मागणी पालिका करणार आहे. दरम्यान, या पूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुळशीच्या पाण्याबाबत धरणाची मालकी असलेल्या टाटा कंपनीशी बोलणार असल्याचे अनेकदा सांगितले आहे.