नवी दिल्ली – शासकीय स्तरावर करोना लसीकरणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न होत आहे. करोना प्रतिबंधक लसीसंदर्भात जनजागृती देखील केली जात असताना या लसीच्या प्रभावासंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारतीय संशोधन अनुसंधान संस्था म्हणजेच आयसीएमआरने लसींच्या परिणामकारकतेसंदर्भात एक रिसर्च केला आहे. या रिसर्चमध्ये करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर व्यक्तीचा मृत्यूचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी होतो, असे समोर आले आहे.
दरम्यान, करोना रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी यातील धोका कमी झालेला नाही. करोनाचे रुग्ण कमी करण्यासाठी लसीकरणावर भर द्यावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लसींविषयी समाजात अनेक गैरसमज असून तेही दूर करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे लसीकरणाचा वेग काहीसा मंदावलेला दिसतो. परंतु आयसीएमआरने नवीन केलेल्या रिसर्चमुळे नागरिकांमधील लसींविषयी भीती दूर होण्यास मदत होणार आहे.
आयसीएमआरने तमिळनाडूच्या पोलीस दलातल्या एक लाख 17 हजार 524 पोलिसांवर हा रिसर्च केला आहे. या रिसर्चदरम्यान लस घेतलेले पोलिस कर्मचारी आणि लस न घेतलेले पोलिस कर्मचारी यांच्यापैकी किती जणांचा करोनाने मृत्यू झाला याबद्दल निरीक्षण करण्यात आले. आयसीएमआरने 1 फेब्रुवारी 2021 ते 14 मे 2021 या कालावधीत हा रिसर्च केला.
लसीचे दोन डोस चौकट
एक डोस घेणाऱ्यांनाही सुरक्षा
लसींचे दोन्ही डोस घेतलेले कर्मचारी 67673 होते तर 17059 पोलीस कर्मचाऱ्यांनी लस घेतली नव्हती. रिसर्चनुसार या कालावधीत 31 पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला. यातील 4 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तर 7 जणांनी एकच डोस घेतला होता. अन्य 20 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती.
यामुळे या रिसर्चमधून समोर आले आहे की, करोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी लसीचे दोन्ही डोस अत्यंत परिणामकारक आहेत. ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी करोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतला होता, त्यांना मृत्यूचा धोका 82 टक्के तर दोन्ही डोस घेतलेल्यांना हा धोका 95 टक्क्यांपर्यंत मृत्यूचा धोका कमी होता असे समोर आले आहे.