नाशिक – केंद्रीय मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे यांचा समावेश न झाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याची चर्चा असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. उगाचच बदनामी करू नका. कोणीही नाराज नसून अशी माहिती कोण देतो असा सवाल उपस्थित करत त्यांनी या बातम्या फेटाळून लावल्या.
देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी भाजपमध्ये सर्व निर्णय सर्वोच्च नेते घेतात. योग्यवेळी निर्णय होत असतात. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचे सांगून त्यांची अकारण बदनामी करू नका, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रातील चार लोकांना संधी मिळाली आहे. खातीही चांगली मिळाली आहेत. बऱ्याच दिवसांनंतर महाराष्ट्राच्या वाट्याला चांगले खाते मिळाले आहे. त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल, असे सांगतानाच नाशिक जिल्ह्याला 50 वर्षांनंतर मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विस्तारामुळे युतीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला का? या प्रश्नावर फडणवीस यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. एक तर चर्चांवर कोणतेही निर्णय होत नसतात. चर्चा वेगवेगळ्या प्रकारे होतात. राणेंना त्यांच्या क्षमतेवर मंत्रिमंडळात घेतले आहे. बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार करण्यात आला नाही, असे ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याबाबत जे काही बोलायचं ते ईडी बोलेल. मी काही ईडीचा प्रवक्ता नसल्याचे ते म्हणाले.