मुंबई – करोना काळात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तम काम केले आहे. घरच्या कुटुंबाप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेची त्यांनी काळजी घेतली. “करोनाच्या काळात आरोग्य खातं चालवणे नव्हते सोपे…, पण त्याला पुरून उरले राजेश टोपे…’, अशा शब्दांत खास केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आरोग्यमंत्र्यांचे कौतुक केले.
“सन्मान देवदूतांचा’ हा विशेष कार्यक्रम आज मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात करोनायोद्ध्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे आठवलेंनी जोरदार टोलेबाजी केली. आपल्या चारोळ्यातून त्यांनी टोपेंचे कौतुक, तर फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदावर मिश्किलपणेदेखील बोट ठेवले.
आठवले म्हणाले, मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपची ताटातूट झाली आणि पुढे जाऊन सेनेने भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसशी आपला नवा संसार थाटला. सत्तासंघर्षाच्या याच काळात मी फडणवीसांना सल्ला दिला होता की, शिवसेनेला अडीच वर्षांचं मुख्यमंत्रिपद देऊन टाका. माझं जर ते म्हणणं फडणवीस यांनी ऐकले असते तर ते आज मुख्यमंत्री असते, असे आठवले म्हणाले.
आठवले एवढंच बोलून थांबले नाहीतर तर तुमच्या दोघांच्यात एकमत होत नसेल तर मला मुख्यमंत्री करा, असेही त्यावेळी मी सांगितले होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली. आठवलेंच्या या विधानांनी आणि सत्तासंघर्षकाळातल्या आठवणींनी सभागृहातील उपस्थितांमध्ये एकच हसा पिकला. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरदेखील स्मितहास्य उमटले.