नवी दिल्ली – बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांनी उत्तरप्रदेशची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा या आधीच केली आहे. तथपि आम्ही कोणत्याही पक्षाची मदत घेण्याखेरीज उत्तरप्रदेशात स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकतो आणि तशी क्षमता कॉंग्रेसकडे आहे असे प्रतिपादन प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अजयकुमार लल्लू यांनी केले आहे.
आम्हीं या राज्यातील विधानसभेची निवडणूक प्रियांका गांधी यांच्या देखरेखेखाली लढवणार आहोत आणि आम्ही या राज्यात तीन दशकांनंतर पुन्हा कमबॅक करणार आहोत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात राजकीय बदलाचे वारे वाहात आहेत आणि ते सध्या स्पष्टपणे जाणवते आहे. प्रियांका गांधी याच या बदलाच्या शिल्पकार आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की प्रियांकांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसची संघटनात्मक ताकद वाढली आहे.
ते म्हणाले की, प्रियांकांमुळे उत्तरप्रदेश कॉंग्रेस पक्षात नवचैत्यन्य आले असून आम्हीच या राज्यात आता सरकार स्थापन करू असे त्यांनी म्हटले आहे. निवडणुकीचा सामना करण्यासाठी ब्लॉक अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष आणि अन्य पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी विभागाच्या पातळीवर प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. येत्या काळात प्रियांका गांधी उत्तरप्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पक्ष बांधणीच्या कामाचा आढावा घेणार आहोत असेही त्यांनी सांगितले.
कॉंग्रेसच्या मतांचे प्रमाण वाढले
प्रदेशाध्यक्ष लल्लू यांनी उत्तरप्रदेशात कॉंग्रेसची ताकद नेमकी कशी वाढली आहे हे नमुद करताना सांगितले की लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला 50 लाख मते मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत आम्हाला 51 लाख मते मिळाली होती पण जिल्हा पंचायत निवडणुकीत कॉंग्रेसला तब्बल 1 कोटी 52 लाख मते मिळाली आहेत याकडे त्यांनी लक्षवेधले. ते म्हणाले की, पक्षाला मिळणाऱ्या या प्रतिसादाची भाजप आणि समाजवादी पक्षालाही धास्ती निर्माण झाली असून आता राज्यात कॉंग्रेस कमबॅक करणार याची त्यांनाहीं खात्री पटत चालली आहे असा दावाहीं लल्लू यांनी केला.