नवी दिल्ली – मिस्टर वाय या नावाने वावरत असलेल्या एका भारतीय सट्टेबाजाकडून पैसे घेत फिक्सिंग केल्याचे उघड झाल्यामुळे अमिरातीच्या आमिर हयात आणि अशफाक अहमद या दोन क्रिकेटपटूंवर आयसीसीने आठ वर्षांची बंदी घातली आहे. आयसीसीनेच ही माहिती दिली आहे.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या सामन्यांमध्ये मॅच फिक्सिंग करण्यासाठी दोन खेळाडूंना भारतीय सट्टेबाजाने पैसे दिल्याचे उघड झाले असून, दोन्ही खेळाडू सट्टेबाजाने दिलेल्या आमिषाला बळी पडले.
भारताचा हा सट्टेबाज मिस्टर वाय या नावाने क्रिकेट विश्वात वावरत असल्याचे समोर आले आहे. क्रिकेट विश्वातील बऱ्याच खेळाडूंबरोबर त्याची ओळख आहे. त्यामुळे तो या खेळाडूंना मॅच फिक्सिंग करण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे पाहायला मिळाले आहे.
यामध्येच दोन खेळाडू गुंतले असून, आता त्यांच्यावर आठ वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे.