लहानपणी शाळेत एक धडा होता. धडा म्हणजे गोष्टच ती. मराठीच्या पुस्तकात होती. त्या गोष्टीत दोन चित्रे होती छान. त्यात एक वासरू दाखवलेले, उड्या मारणारे, हुंदाडणारे. दुसऱ्या चित्रात एक उंट, उंटावर बसलेला एक माणूस होता. त्याच्या भोवती गर्दी जमलेली. उंटावर बसलेल्या त्या माणसाचा चेहरा नीट दिसत नव्हता, पण चित्र पाहिल्याबरोबर नजरेत भरत होती ती त्याची लांबलचक दाढी. अगदी पांढरीशुभ्र! हात वर करून तो काही तरी सांगत असल्याचे दिसत होते.
तर ती गोष्ट काहीशी अशी होती- एका शेतकऱ्याचे वासरू चुकून घरात शिरते आणि काही तरी खायला मिळेल म्हणून एका मडक्यात डोके खुपसते. पण एकदा मडक्यात खुपसलेले डोके काही त्याला पुन्हा बाहेर काढता येत नाही. मग ते तसेच इकडे तिकडे फिरू लागते. हंबरू लागते. त्याला पाहायला घरातले आणि बाहेरचे, खूप लोक जमा होतात.
त्या वासराला ते पकडू पाहतात, पण ते काही हाती लागत नाही. आता काय करायचे हा प्रश्न पडतो. वासरू घरातच फिरतच असते. तेवढ्यात तिकडून गावातला सर्वात शहाणा माणूस येतो. आपल्या शहाणपणाबद्दल तो प्रसिद्ध असतो. नेहमी उंटावरून फिरत असल्याने त्याल सगळे उंटावरचा शहाणाच म्हणतात.
तो आल्यावर सगळे बाजूला होऊन त्याला वाट देतात. तो शेतकऱ्याच्या अंगणात येतो. वासरू घरात असते. लोक त्याला वासराची सगळी गोष्ट सांगतात. तो म्हणतो, मला प्रथम वासराला बघितले पाहिजे, त्याला बघण्यासाठी घरात गेले पाहिजे. तेव्हा मला घरात जाण्यासाठी भिंत पाडा. ते तर काही शक्य नसते. ते त्याला काही उपाय करायला सांगतात.
मग तो म्हणतो, सोपे आहे. वासराचे डोके मडक्यातून बाहेर येत नाही ना, मग त्याचे मुंडके कापा. सोपी गोष्ट आहे. हे ऐकून सगळे कपाळावर हात मारून घेतात. तेवढ्यात घरात धडपडणारे वासरू कशावर तरी आपटून मडके फुटते आणि मग ते आनंदाने उड्या मारत घराबाहेर येते. त्याला पाहून शेतकरी म्हणतो, भिंत पाडायला, माझ्या वासराची मान कापायला निघालेल्या या उंटावरच्या शहाण्यापेक्षा माझे वासरूच जास्त शहाणे आहे.
हे ऐकल्यावर सगळे लोक हसू लागतात आणि तो उंटावरचा शहाणा काहीही न बोलता तिथून काढता पाय घेतो.इथे गोष्ट संपते.आपल्याला असे उंटावरचे शहाणे आजूबाजूला नेहमी भेटतच असतात. कधी ते आपल्या वाट्याला येतात, तर कधी त्यांचे दुरून दर्शन होते. मात्र त्यांचे अस्तित्व ते सतत दाखवून देत असतात.
आपल्या वैयक्तिक जीवनात, सामाजिक जीवनात आणि सर्वाधिक दिसतात ते आपल्या राष्ट्रीय समस्यांच्या बाबतीत. समस्या सोडवण्यापेक्षा त्या अधिक गुंतागुंतीच्या कशा होतील, कशा चिघळतील यातच जणू त्यांना अधिक “इंटरेस्ट’ असतो. आणि त्याहूनही गमतीची गोष्ट म्हणजे त्यांच्यामागे टाळ्या पिटणारा, वाहवा करणारा एक वर्ग असतो. उंटावरच्या शहाण्यापेक्षाही हा वर्ग अधिक त्रासदायक असतो.
-अनुराधा पवार