वृत्तसंस्था – जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. भारतात सुद्धा करोनाचा विळाखा घट्ट बसलेला बघायला मिळाला आहे. करोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. या जिवघेणा विषाणूवर एकमेव उपाय तो म्हणजे लस. देशात लसीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. मात्र लसीचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने एक दिलासादायक बातमी दिली आहे.
दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसींचे डोस दिल्यानंतरही लस प्रभावी ठरत असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी दिली आहे. दोन वेगवेगळ्या लसी व्यक्तीला दिल्यामुळे अधिक प्रतिसाद देणारी रोगप्रतिकारकशक्ती तयार होत आहे.
डॉ. सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या की, दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लसींचे डोस दिल्यानंतरही लस प्रभावी ठरत आहे. तसेच भिन्न लसी दिल्यानंतर दुष्परिणामही जाणवत आहेत. जर्मनी, ब्रिटन आणि स्पेनमधील आकडेवारीनुसार दोन वेगळ्या कंपन्यांच्या लसी घेणाऱयांना ताप, अंगदुखी आणि अन्य साइड इफेक्ट्स दिसून आले, मात्र हे इफेक्ट्स गंभीर नाहीत ही समाधानाची बाब आहे.
वेगवेगळ्या लसी व्यक्तीला दिल्यामुळे अधिक प्रतिसाद देणारी रोगप्रतिकारकशक्ती तयार होत आहे. यामध्ये उच्चस्तरीय अॅण्टीबॉडीज आणि पांढऱ्या पेशी तयार होत आहेत. या करोना विषाणूने प्रभावित पेशींचा खात्मा करतात.