नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधून लोकसभेवर निवडून गेलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ मागील काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. ही चर्चा त्यांनी केलेल्या विवाहावरून सुरु असून यातून आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे. तसेच या वादात आता भाजपने उडी घेतली आहे.
नुसरत जहाँ यांचे पती निखिल जैन यांच्यासोबत वाद सुरु असल्याच्या चर्चा सुरूवातीला समोर आल्या. त्यानंतर आमचे लग्नच भारतीय कायद्याच्या चौकटीत अवैध असल्याचे सांगत नुसरत जहाँ यांनी गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या याच गौप्य्स्फोटावर आता भाजपाचे खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार करत मोठी मागणी केली आहे.
भाजपाचे खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. मौर्य यांनी लग्नाच्या मुद्द्यावरून नुसरत जहाँ यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. नुसरत जहाँ यांची वर्तणूक मर्यादेचा भंग करणारी असून, त्यांनी लग्नाचा विषय आपल्या मतदारांपासून लपवून ठेवला. यामुळे संसदेच्या प्रतिष्ठेवरही धूळ उडाली आहे. हे प्रकरण संसदेच्या एथिक्स कमिटीकडे पाठवण्यात यावे. याची चौकशी करून नुसरत जहां यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी खासदार मौर्य यांनी म्हटले आहे.
भाजपा खासदार संघमित्रा मौर्य यांनी नुसरत जहाँ यांच्या लग्नाबद्दलही काही बाबी पत्रातून मांडल्या आहेत. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतरनुसरत जहाँ पहिल्या दिवशी सभागृहात नवरीप्रमाणे तयार होऊन आल्या होत्या. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुद्धा नुसरत जहाँ यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाल्या होत्या, असा उल्लेखही मौर्य यांनी केला आहे.