मुंबई: राज्यातील करोनाची दुसरी लाट आता हळू हळू ओसरली आहे. मात्र आता राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आहे. राज्यातील वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेपुढे आणखी एक मोठे आव्हान उभे राहिले आहे. राज्यातील वटवाघुळांमध्ये निपाह विषाणू आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी याबद्दलचे संशोधन केले आहे. निपाह विषाणू असलेल्या वटवाघुळांच्या प्रजाती साताऱ्यातल्या महाबळेश्वरमधील गुफेत मार्च २०२० मध्ये आढळून आल्या. याआधी राज्यात कधीही वटवाघुळांमध्ये निपाह विषाणू आढळून आला नव्हता अशी माहिती याबद्दलचे संशोधन करणाऱ्या पथकाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली.
देशात याआधी काही राज्यांमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू वटवाघूळांमधून माणसांमध्ये संक्रमित होतो. निपाह विषाणू अतिशय धोकादायक मानला जातो. निपाहवर कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. निपाह विषाणूची लागण झाल्यानंतरचा मृत्यूदर खूप जास्त आहे. करोनाची लागण झालेल्यांपैकी बहुतांश जण बरे होतात.
देशातील जवळपास सगळ्याच राज्यांचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या पुढे आहे. तर मृत्यूदर १ ते २ टक्क्यांच्या दरम्यान आहे. निपाहवर औषध उपलब्ध नसल्याने मृत्यूदर तब्बल ६५ टक्क्यांच्या पुढे आहे. गेल्या काही वर्षांपासून वटवाघळांमुळे विषाणू पसरत असल्याचे वारंवार समोर आले आहे. इबोला, मारबर्ग यासारखे विषाणू वटवाघुळांमुळेच पसरले होते. करोना विषाणूच मूळदेखील वटवाघळांमध्येच असल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
निपाह विषाणूचा सर्वप्रथम १९९८-९९ साली मलेशियात आढळून आला. डुकरं आणि डुकरांची काळजी घेणाऱ्यांमध्ये तेव्हा हा विषाणू आढळून आला. त्यावेळी मृत्यूदर ४० टक्के होता. २००१ मध्ये पश्चिम बंगालच्या सिलिगुडीत निपाह आढळला. यानंतर २००७ मध्ये पश्चिम बंगालच्याच नाडिया जिल्ह्यात निपाह आढळला. २०१८ मध्ये केरळच्या कोझिकोडेत निपाहमुळे १८ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा कोझिकोडेत निपाह आढळून आला.