पुणे – मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एका रासायनिक कंपनीला आग लागून 17 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याप्रकरणी अटक केलेल्या कंपनीच्या मालकाच्या पोलीस कोठडीत 15 जूनपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. त्याची व्याप्ती मोठी आहे. अटक केलेली व्यक्ती तपासास सहकार्य करत नाही. त्या कंपनीत ऑक्टोबर 2017 मध्ये यापूर्वी आगीची घटना घडली होती. त्यामध्ये कंपनीतील एक खोली जळाली होती. यातून कोणताही बोध न घेता दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाने दिलेल्या परवानगीशिवाय ज्वालाग्राही पदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला होता. याबाबत तपास करण्यासाठी त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्योती लक्का यांनी केली.
निकुंज शहा ( वय 39 रा. सहकारनगर) असे पोलीस कोठडीत वाढ केलेल्याचे नाव आहे. त्याचा दुबईत असलेल्या भाव केयुर आणि वडील बिपीन जयंतीलाल शहा ( वय 68 रा .सहकारनगर) या दोघांवर पौड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी फिर्याद दिली आहे.
7 जून रोजी एस.व्ही. अकवा कंपनीला आग लागून त्यात 17 कामगारांचा होळपळून मृत्यू झाला आणि 5 कामगार गंभीर जखमी झाले. या प्रकरणात पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी निकुंज याला न्यायालयात हजर केले होते.